जांब प्रचार सभेत मदन भोसले यांच्यावर आ. मकरंद पाटील यांचा घणाघात
भुईंज – 2004 च्या विधानसभा निवडणुकीत वाई मतदारसंघातील जनतेने मदन भोसले यांना निवडून दिले होते. मात्र, त्यांना पाच वर्षात जनहिताची कोणतीच कामे मार्गी लावता न आल्याने 2009 व 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने तुम्हाला नाकारले. गेल्या दहा वर्षात मी काय केले, हे विचारण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही, असा घणाघात मकरंद पाटील यांनी केला.
वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे उमेदवार आ. मकरंद पाटील यांनी रविवारी (दि. 6) भुईंज गटातील गावांचा प्रचार दौरा करुन रात्री जांब येथे सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले.
आ. मकरंद पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील हे एक सुसंकृत, उच्चशिक्षित, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी दहा वर्षे संसदेत सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावले होते. श्रीनिवास पाटील यांनी आजपर्यंत प्रत्येक जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यानेच लोकसभा पोटनिवडणुकीत शरद पवार त्यांची उमेदवारी घोषित केली आहे. यावेळी उमेदवार सर्वसामान्यांच्या पसंतीचा व सर्वसामान्यातील आहे, जनतेची कामे करणारा आहे, सर्वांनी त्यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
गेल्या दोन निवडणुकांमध्ये मतदारांनी मला चढत्या क्रमाने निवडून दिले. पवारसाहेबांनी तिसऱ्यांदा माझ्यावर विधानसभा निवडणूक लढण्याची जबाबदारी सोपवली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये मतदारसंघातील अडीअडचणी सोडवण्याचा, जनतेच्या सुख-दुःखाच्या प्रसंगांमध्ये वेळात वेळ काढून धावून जाण्याचा प्रयत्न मी केला. दहा वर्षे सातत्याने जनतेच्या संपर्कात राहिलो आहे. आता आमचे विरोधक विचारत आहेत की, दहा वर्षांत आमदाराने काय केले?
मी काय केले ते मतदारांना माहीत आहे; परंतु तुम्हाला पाच वर्षे संधी दिली होती, तेव्हा तुम्हाला काहीच काम करता आले नाही. त्यानंतर जनतेने तुम्हाला घरी बसवल्यावर कारखान्याचा व्याप असल्याने जनसंपर्क साधता आला नसल्याचे तुम्ही सांगत आहात. विरोधकांनी किसनवीर साखर कारखान्यावर 850 कोटींच्या कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. बारा महिने कारखान्याच्या कामगारांना पगार दिले नाहीत, शेतकऱ्यांच्या उसाला दर देता आला नाही, असा आरोप आ. पाटील यांनी केला.
ज्येष्ठ कार्यकर्ते प्रताप पवार, पंचायत समितीच्या सभापती रजनी भोसले, माजी सभापती प्रमोद शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, दिलीप बाबर, उदयसिंह पिसाळ, मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष दीपक बाबर, सुरेश बाबर, कांतिलाल पवार, प्रकाश पावशे, सुधीर भोसले, संतोष शिंदे, सुजित जाधवराव व नागरिक उपस्थित होते.