मारुती जैनक
दोन घास पोटात ढकलून आम्ही वामकुक्षीच्या तयारीत व्हतो. तोच कानशिलावर ब्रेकिंग न्यूज धडकली. घटकाभर आमचा आमच्यावरच विश्वास बसेना. “हे घडूच कस्सं शकतं?’…टीव्ही ऑन केला अन् साऱ्या घडामोडी उलगडू लागल्या. हरेक चॅनेलवर एकच; बंड…बंड अन् बंड! कुणाचं तर, बारामतीकर दादांचं! तेही आक्षी थंड डोक्क्यांनं!! आत्ता ह्याला खर्रोखर्रऽचं बंड म्हणावं की, खेळी? अस्सा सवाल आमच्या डोस्क्यात घोळू लागला. थेट देवगिरी गाठावी आणि खऱ्या-खोट्याची खातरजमा करावी, अस्संही मनात आलं; पण आमच्यासारख्या फाटक्यांना तिथ्थं कोण विच्चारतो?..
…अर्थात हा सारा राजकीय तमाशा बघताना आमच्या तळपायाची आग मस्तकात भिडत व्हती. घळाघळा आसवं ढाळणारा उभा महाराष्ट्र आमच्या नेत्रचक्षुंपुढे उभा ठाकत व्हता. सत्तेसाठी स्वाभिमानाच्या चिंधड्या करण्यात कसली आलीय धमक?..आम्ही मनाशीच पुटपुटत निःशब्द जाहलो.
कालपर्यंत सारं आलबेल असताना आज अस्सं एकाकीच घड्याळाचं काटं उरफाटं फिरू लागल्यानं आम्ही चक्रावलो. तश्शातच आम्ही पुण्यातल्या मोदीबागेचा कानोसा घेतला. काकांना लागलेला घोर आमच्या जिवाला चर्रर्रऽ करून गेला. एवढ्या हिकमतीनं त्यांनी पक्ष उभा केला; पण आज पुतण्याच वरचढ जहाल्यानं त्यांच्या जिव्हारी लागलेलं; पण त्यांच्यातला मुरब्बी राजकारणी तसुभरही ना खचला व्हता, ना बिचकला व्हता! अर्थातच आम्हास त्यांचं मोठ्ठ कौतिक वाटलं.
“”निवडणुका आल्या की, आम्ही “एकच वादा-अजितदादा’ अस्सं घस्सा ताणून ताणून कोकलायचो; पण त्याच दादांनी आम्हास विच्चारात न घेताच ऐऱ्यागैऱ्यांशी घरोबा केला,” अश्शी व्याकुळताही काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी आमच्याजवळ बोलून दाखवली; पण त्यांची कणव करण्यापलीकडं आम्ही करणार तरी काय?
…महाराष्ट्रात रंगलेल्या या राजकीय महानाट्यानं आम्ही थोडं फ्लॅशबॅकमध्ये गेलो. दादांचा पहाटेचा शपथविधी…बर्रोबर सालापूर्वी नाथाभाईंनी उधोजीराजांशी घेतलेला काडीमोड. नाथाभाई केवळ काडीमोड घेऊनच थांबले नाहीत, तर त्यांनी धनुष्यबाणासह आख्खी सेनाच पळवली. आजच्यालाही तेच घडलं. काकांनी मोठ्या कष्टानं उभी केलेली राष्ट्रवादी दादांनी घड्याळासह “हायजॅक’ केली. काकांनी ज्यांना बोट धरून मोठ्ठ केलं, त्यांनाही दादांनी सत्ताधाऱ्यांच्या दावणीला पळवलं. त्यातून आम्हास नाडीवाल्या दादांच्या “पळवापळवी’ची याद जहाली.
आजवर आम्हास विमानाच्या हायजॅकची गोष्ट ठाऊक व्हती; पण आत्ता राजकीय पक्षांचही हायजॅक व्हतं, हे आम्हास नव्यानंच उमगलं.
…आत्ता दादांनी रंगवलेल्या या राजकीय महानाट्याला महाभूकंप म्हणावा, की खेळी, हा प्रश्न तस्सा अजून तरी डब्ब्यातच आहे. भाकरी फिरवायला सांगणारे काकाच नेमक्या वक्ताला हा डब्बा उघडतील, अस्सं मनाशी पुटपुटत आम्ही पुन्हा बिछाना धरला.
ही “खेळी’च ठरो अस्सं तेहतीस कोटी देवांना साकडं घालत आम्ही झोपेची गोळी गटकन गिळली. आमच्या झाकलेल्या डोळ्यांसमोर आत्ता छबी तरळत व्हती, ती फक्त दादांची. आजवर पक्षाचं-काकांचं इमान राखलेल्या दादांसाठी “तू वादा ना तोड…’ हे गाणं गुणगुणतच आम्ही तोंडावर पांघरूण घेतलं.