पिंपरी – करोनाच्या महामारीत अनेक सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक, कौटुंबिक नुकसान झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात करोनामुळे दोन हजार 500 महिलांच्या पतीचे निधन झाले आहे. कुटुंबातील कर्त्या पुरूषांचे निधन झाल्याने त्यांच्यापुढे जगण्याची भ्रांत निर्माण झाल्याने त्यांना राज्य सरकार, महापालिकेने सहकार्य करावे. त्यांच्या मुलांची फी माफ करावी, शासकीय नोकरीत प्राधान्य द्यावे, बॅंकेचे कर्ज माफ करावे, अशा विविध प्रश्नांसाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, या मागणीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पिंपरी-चिंचवड शहरातील मनसेच्या महिला आघाडीच्या सचिव सीमा बेलापूरकर यांनी 50 विधवा महिलांसह नुकतीच भेट घेतली.
यावेळी मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता, मनसेचे नेते गणेश सातपुते, किशोर शिंदे, मनसेचे शहर सचिव रुपेश पटेकर आदी उपस्थित होते. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शहरातील अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वसामान्य जनता होरपळून गेली.
आताशी जनजीवन पूर्वपदावर येत असताना करोनात विधवा झालेल्या महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विधवा झालेल्या महिलांच्या मुलांची शाळेतील फी माफ करावी, बॅकेचे कर्ज माफ करावे, शासनाच्या योजनांमध्ये घरे राखीव ठेवावीत, शासन, महापालिका, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये भरतीमध्ये करोनामध्ये विधवा झालेल्या महिलांच्या मुलांना नोकरीसाठी प्राधान्य द्यावे, मालमत्ता करामध्ये सवलत द्यावी, भुकंपग्रस्त व पुरग्रस्त मधील नागरीकांना वेगळे ओळखपत्र देण्यात येते. त्याप्रमाणेच करोना काळातील विधवा झालेल्या महिलांनाही वेगळे ओळखपत्र मिळावे, अशा विविध मागण्या सीमा बेलापूरकर यांनी मनसेचे अध्यक्ष ठाकरे यांच्याकडे केल्या. तसेच यावेळी विधवा महिलांनी दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी ठाकरे यांना सांगितल्या. विधवा महिलांचे सर्व प्रश्न व्यवस्थित समाजावून घेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधवा महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती बेलापूरकर यांनी सांगितली.
दरम्यान, राज ठाकरे यांची भेट घडवून आमच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल सर्व महिलांनी मनसेच्या महिला आघाडीच्या सचिव सीमा बेलापूरकर यांचे आभार मानले.