पिंपरी – अनेक स्वप्ने मनात रंगवित मोठ्या आनंदात दोन व्यक्ती नव्या आयुष्याची सुरुवात करतात. परंतु काही दिवसांतच संशयाची पाल मनात चुकचुकायला लागते तर कधी कुटुंबीयांचा अनावश्यक हस्तक्षेप सुखी संसाराला दृष्ट लावतात. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलकडे वर्षभरात 366 तक्रारी आल्या आहेत. यात प्रामुख्याने वैवाहिक जीवनासाठी दोन बाबी मोठी संकटे ठरतात ती म्हणजे संशय आणि पत्नीच्या माहेरकडच्यांचा हस्तक्षेप. बहुतेक प्रकरणांमध्ये समेट घडवून संसार पुनःस्थापित करण्यास भरोसा सेलला यश देखील येत आहे.
सध्या पती-पत्नी दोघेही काम करत असल्याने संवाद कमी ताण जास्त जाणवतो. घरी आल्यानंतरही मोबाइलचा वापर वाढल्याने नात्यातील संवाद हरवत चालला आहे. हा संवाद पुनःस्थापित करण्यासाठी पती अथवा पत्नीकडून तिसऱ्या व्यक्तीची मदत घेतली जाते. मदतीसाठी तासनतास तिसऱ्या व्यक्तीसोबत गप्पा होतात. पण पती-पत्नीमध्ये संवाद मात्र होतच नाही. जी व्यक्ती मध्यस्थी करते तीच संशयाचे कारण ठरते आणि सुखी संसारात मिठाचा खडा पडतो. लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस लग्नानंतरही न विसरल्याने विवाहबाह्य संबंध सुरु होतात. त्यामुळे हे देखील संसार तुटण्यासाठी मोठे कारण ठरत आहे.
उसवलेले संसार जोडण्यास “भरोसा सेल’ला यश
वेगवेगळ्या कारणांनी उसवलेले संसार पुन्हा जोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या भरोसा सेलकडे येतात. मागील वर्षभरात या सेलकडे 366 अर्ज आले असून त्यात 266 महिला तर 100 पुरुषांनी तक्रारी केल्या आहेत. त्यातील 81 प्रकरणांमध्ये समेट घडविण्यात भरोसा सेलला यश आले आहे. ज्यामध्ये समेट होत नाही अशी प्रकरणे न्यायालय अथवा पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. आलेल्या तक्रारदारांचे प्रत्येक मंगळवार आणि बुधवारी येणाऱ्या समुपदेशकांकडून समुपदेशन केले जाते. पोलीस उपनिरीक्षक माधुरी पोकळे, पोलीस अंमलदार अनिता जाधव, उन्नती सोनवणे, नितीन जगताप, माया आभाळे, अपर्णा तापकीर, स्वाती रुपनवर, अंजुम पठाण यांचे पथक समझोता घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मुलांची फरफट
लग्न झाल्यानंतर अवघ्या काही वर्षात पती-पत्नीमध्ये वादाला तोंड फुटते. मुले लहान असतानाच घरात आई वडील भांडत असतात. त्यात मुलांची फरफट होते. काही प्रकरणात तर पती-पत्नी घटस्फोटापर्यंत पोहोचतात. यात मुलांच्या कोवळ्या मनांचा आणि त्यांच्या भविष्याचा कुठेच विचार केला जात नाही.
नको तेवढी लुडबुड
भरोसा सेलकडे आलेल्या एकूण तक्रारींपैकी वर्षभरात 100 तक्रारी पुरुषांनी केल्या आहेत. तर 266 तक्रारी महिलांनी केल्या आहेत. पत्नीच्या माहेरची मंडळी आमच्या संसारात नको तेवढी लुडबुड करतात. पत्नीच्या डोक्यात नको ते विचार भरवले जात असल्याने आमच्या संसारात नेहमी वाद होतात. काही केल्या पत्नी ऐकत नाही, माझंच खरं असा तिचा सूर असतो. अशा प्रकारचे रडगाणे पुरुषांनी केलेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक आहे. त्यासोबत मोबाइल, संशय आणि इतर कारणे देखील पुरुषांच्या तक्रारींत आहेत.