मुंबई – महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे आणि कुंदन शिंदे यांना सीबीआय आज आपल्या ताब्यात घेणार आहे. भ्रष्टाचारप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे.
दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे सरकारला दणका दिला आहे. देशमुख यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची राज्य सरकारची याचिका फेटाळण्यात आली आहे.
देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात ८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी 25 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ईडीला देशमुख यांच्या जामीन अर्जावर आठवडाभरात उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. देशमुख सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत.
100 कोटी रुपयांची बेकायदेशीर वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने फेब्रुवारीमध्ये देशमुख यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री 1992 पासून आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी बेकायदेशीरपणे भरपूर पैसा आणि मालमत्ता जमवली आहे. 13 कंपन्यांमध्ये बेकायदेशीररीत्या कमावलेल्या पैशांचा वापर करण्यात आला. या कंपन्या देशमुख यांचे पुत्र किंवा त्यांचे निकटवर्तीय चालवतात, असंही ईडीने म्हटलं आहे.