पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यास राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा घेण्याच्या दृष्टीने परीक्षा परिषदेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
टीईटी परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी शासनाकडून एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. मराठी, इंग्रजी, उर्दू आदींसह एकूण ९ माध्यमांतून ही प्ररीक्षा होते. त्यामुळे ती ऑनलाइन घेण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. याबाबत कंपनीने परीक्षा परिषदेला कळविले होते. त्यावर परिषदेने शासनाला पत्रव्यवहार केला होता. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत परवानगी मिळविण्याचा प्रस्तावही पाठविला होता. त्याला शासनाने मान्यता दिली आहे.
शिक्षक पदासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आलेली आहे. राज्यात सध्या शिक्षक भरतीची प्रकिया सुरू आहे. आगामी काळातही शिक्षक भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षातून दोन वेळा टीईटी परीक्षा होणे अपेक्षित आहे. काही कारणास्तव वर्षातून दोन वेळा परीक्षा होत नाही. वर्षातून एकदाच ही परीक्षा घेण्यात येते. त्यामुळे उमेदवारांना परीक्षेबाबत उत्सुकता लागलेली असते.
टीईटी परीक्षेत झालेला घोटाळा विचारात घेता टीईटी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेऊन या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करणे शक्य झाले असते. ऑफलाइन परीक्षेमुळे नियोजनासह निकाल जाहीर करण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अवधी मिळणार आहे. यापूर्वीच्या परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिषदेकडून अत्यंत काळजीपूर्वक परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे.
एप्रिलमध्ये अर्ज प्रक्रिया
परीक्षेच्या कामकाजासाठी विषय शिक्षकांची कार्यशाळा घेण्याबाबत परिषदेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. एप्रिलमध्ये उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेतील अधिकारी यांच्याकडून मिळाली आहे.