बंगळुरू: भारत आणि बांगलादेश यांच्यात होत असलेल्या दिवसरात्र कसोटीने आता कसोटी क्रिकेटला सुगीचे दिवस येतील. मात्र केवळ याच सामन्याबाबत समाधानी न राहता भविष्यात असे सामने सातत्याने आयोजित केले जावेत अशी आग्रही मागणी माजी कसोटीपटू राहुल द्रविडने केली आहे.
कसोटी क्रिकेटचे गतवैभव पुन्हा मिळवायचे असेल तर चाहत्यांना मोठ्या संख्येने मैदानावर आणणे महत्त्वाचे आहे, मग त्यासाठी दिवसरात्र कसोटीसारखे प्रयोग सातत्याने केले पाहिजेत. कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा आत्मा आहे, त्यामुळे नवोदित खेळाडूंना देखील याबाबत जागृत करण्याचे प्रयत्न करायला हवेत.
केवळ मर्यादित षटकांच्या सामन्यातच खेळण्याची मानसिकता बदलायला पाहिजे. इतकेच नाही तर रणजी स्पर्धा, कसोटींचे महत्त्व याबाबत व्यापक जागृती व्हावी, असेही द्रविडने व्यक्त केले. मैदानावरील दवाच्या परिणामांवर नियंत्रण मिळवू शकलो तर दिवस-रात्र कसोटी सातत्याने आयोजित करणे सोपे ठरेल. दवामुळे चेंडू ओला होतो, मग अशा चेंडूवर गोलंदाजी करणे हे आव्हान ठरते. वेगवान गोलंदाजांनाही चेंडू स्विंग करता येत नाही, असेही द्रविड म्हणाला.
ग्रीप आणि रिलीजचे आव्हान
गुलाबी चेंडूवर द्रव्याचा थर जास्त टाकला जात असल्याने ग्रीप करणे सोपे नसते. विशेषतः ऑफस्पिनरना ते जास्त कठीण ठरते. त्यातही मैदानावरील दवाचा परिणाम गुलाबी चेंडूवर होतो. त्यामुळे चेंडू अचूकपणे ग्रीप करणे तसेच तो रिलीज करणे याचेच गोलंदाजांसमोर आव्हान राहील. हा सामना झाला की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सातत्याने असे सामने खेळले पाहिजेत व त्यासाठी देशांतर्गत स्पर्धेतही असे सामने जास्त आयोजित केले तरच खेळाडूंना अनुभव मिळेल.
सुसज्ज मैदाने असावीत आंतरराष्ट्रीय सामना पाहण्यासाठी जेव्हा प्रेक्षक मैदानात येतात तेव्हा त्यांना सुसज्ज दिसायला पाहिजे. द्रविडने याबाबत पुण्यात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीचा अनुभव सांगितला. प्रेक्षकांना मूलभूत सोयीदेखील मिळाल्या नव्हत्या. त्याविषयी प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. स्वच्छतागृहांचा स्थिती, आसनव्यवस्था, वाहनतळाची व्यवस्था या व अशा गोष्टींकडे गांभीर्याने पाहावे लागेल. प्रेक्षकांना सुसज्ज मैदान मिळणे आवश्यक आहे, असेही द्रविडने सूचित केले.