उत्तम पिंगळे
काल प्राध्यापकांकडे गेलो तर प्राध्यापक कुणाशी तरी फोनवर उत्साहाने बोलत होते. प्राध्यापक म्हणाले हो, हो, या, मी सायंकाळी घरीच आहे व फोन ठेवला. मला म्हणाले या, या बसा. मी म्हणालो, सर आज तुम्ही उत्साहात दिसत आहात. त्यावर सर म्हणाले की, होय बरोबर आहे. आपण कित्येक वेळा बोलतो की सरकारी नोकर कामचुकार असतात वर त्यांना पगारवाढही आपोआप होत असते. पण सर्वच बाबतीत असे असते असे नाही. मग मी विचारल्यावर सरांनी मला सविस्तर सांगितले.
देशातील सर्व महानगरांच्या तुलनेमध्ये मुंबईतील नळाचे पाणी सर्वात शुद्ध असल्याचा केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्र्यांच्या अहवालावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबईच्या पाण्याने शुद्धतेचे सर्व 11 निकष पूर्ण केलेले असून इतर महानगरे 17 राज्यांच्या राजधानी शहरातील पाण्याचा दर्जा यामुळे समोर आलेला आहे. मुंबईचा पाणीपुरवठा हा तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा, विहार, तुळशी, भातसा व मध्य वैतरणा या तलावांमार्फत होत असतो. ही सर्व धरणे मुंबईपासून सुमारे 125 किमी अंतरावरील परिघातून ठाणे जिल्ह्यात आहेत व समुद्रसपाटीपेक्षा उंचीवर असल्यामुळे गुरुत्वाकर्षणाने आपोआप पाणी खाली आणले जाते.
पाणी शुद्धीकरण झाल्यावर त्यानंतर विविध ठिकाणी असलेल्या 27 जलाशयांमार्फत पाण्याचे शहर व उपनगरात वितरण केले जाते. असे करत असताना पाण्याच्या शुद्धतेकडे लक्ष दिले जाते. वैतरणातून पाणी येतानाच त्याला क्लोरीनची मात्रा दिली जाते. पुन्हा ही मात्रा 70 किमी अंतरावर असताना दिली जाते. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आल्यावर पुन्हा ते तपासण्यात येते व किती क्लोरीन आहे व शुद्धता किती आहे त्यानुसार पुन्हा क्लोरीनची मात्रा दिली जाते. जेणेकरून सर्व जीवजंतू व अशुद्ध घटक काढून टाकण्यात येतात. पुढे पाण्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाऊन तुरटीप्रमाणे ती क्रिया होऊन पाण्यातील अशुद्ध रसायने पाण्यावर तरंगू लागतात. तळाचे शुद्ध पाणी वेगळे करून ते पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जाते. शुद्ध झालेल्या पाण्याच्या वितरणापूर्वी विविध चाचण्या होतात यासाठी प्रत्येक प्रकल्पात अत्याधुनिक प्रवेशशाळा आहेत. पाण्याचे रॉ वॉटर, क्लोरी फायर वॉटर, फिल्टर वॉटर आणि फायनल वॉटरचे वर्गीकरण करून त्यांची सर्व तपासणी होते.
आता एवढा सारा व्याप सांभाळायला विविध प्रकारचे तंत्रज्ञ, कामगारांपासून अभियंते व त्यांना निर्देश करणारे त्यांचे वरिष्ठ या सगळ्यांची टीम कार्यरत असते. असा पाणीपुरवठा करत असताना त्याची शुद्धता, त्याचे प्रमाण व नियमितपणा हे महत्त्वाचे असते. असे काम करीत असताना कित्येक प्रसंग कसोटीचे येतात. पाइपलाइन फुटणे, मग तेथे आणीबाणीची दुरुस्ती अशी वेळ काही सांगून येत नाही. अशा वेळी तत्पर सेवा देऊन त्या खंडित लाइनची दुरुस्ती केली जाते मग प्रहर कोणताही असो. आज आपल्या मुंबईच्या पाण्याने देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे ही त्या खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाची पावती आहे.
नुकतेच सांगली व कोल्हापूर येथे पूर आला आला असताना त्यांची सर्व पाणीपुरवठा केंद्रे पुन्हा कमीत कमी वेळात चालू करण्याकरता मुंबईच्या टीमला बोलावले होते. आज मुंबईच्या पाण्याची गुणवत्ता ही देशात सर्वात अधिक चांगली आहे तसेच अनेक बाटलीबंद पाण्यापेक्षाही चांगली यापेक्षा दुसरे यश कोणते असू शकेल?