नवी दिल्ली – लष्कराला शत्रुंपासून देशाचे रक्षण करायचेच आहे, मात्र देशवासियांची मने जिंकण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. त्यामुळे पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याची त्यांनी दक्षता घ्यावी असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. पुंछ येथील दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराकडून करण्यात आलेल्या चकमकीत काही सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याच्या पाश्र्वभूमीवर राजनाथ यांचे विधान महत्वाचे मानले जाते आहे.
या प्रकरणात लष्कराच्या तीन अधिकाऱ्यांना अगोदरच ताब्यात घेण्यात आले असून एका अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरमधून दहशतवादाचे उच्चाटन झालेच पाहिजे. हा दहशतवाद संपवण्याच्या कटीबध्दतेने तुम्ही पुढे जा, असेही त्यांनी यावेळी लष्कराच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
केंद्रशासित जम्मू काश्मीरमधील सुरक्षेच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी राजनाथ सिंह एक दिवसाच्या काश्मीर भेटीवर आले होते. यावेळी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे त्यांच्या समवेत होते. विमानतळावर नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्यांचे स्वागत केले.
२२ डिसेंबर रोजी या भागात दहशतवाद विरोधी अभियानात २७ते ४२ वयोगटातील तीन नागरिकांचे मृतदेह आढळून आले होते. लष्कराच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर या तिघांना चौकशीसाठी लष्कराकडून ताब्यात घेण्यात आले होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. वातावरण तापल्यावर लष्कराने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.
एका ब्रिगेडीअरला हटवण्यात आले आहे तर तीन अन्य अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तयारी सुरू आहे. ग्रामीण भागातील तीन जणांचे मृतदेह आढळल्यानंतर उदभवलेल्या परिस्थितीच्या पाश्र्यभूमीवर प्रशासनाने राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद केली आहे. स्थितीचा आढावा घेतल्यावरच सेवा पुन्हा सुरू केली जाईल असे प्रशासनाने म्हटले आहे.