पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) वतीने येत्या ऑक्टोबरपासून राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम दाखविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी विद्या प्राधिकरणाच्या वतीने विविध ऑनलाइन उपक्रम राबविण्यात येत आहेत. काही ठिकाणच्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणाची साधने उपलब्ध नसल्याने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मे महिन्यात केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे दूरदर्शनवर वेळ मिळावा यासाठी पत्र पाठविले होते.
परंतु त्यावेळी कार्यक्रम सुरु करता आले नाहीत. आता महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने विद्या प्राधिकरणाच्या सहकार्याने पहिली ते आठवीसाठी टिलीमिली हा कार्यक्रम सुरु केला. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणताच ऑनलाइन कार्यक्रम सादर केला जात नव्हता. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर कार्यक्रम दाखविण्याचे नियोजन केले आहे. विद्या प्राधिकरणाच्या संचालक दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
दूरदर्शनवर दाखविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा कंटेन्ट तयार करण्यात येत आहे. त्यानंतरच कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर होणार आहे. सकाळी चार तासांच्या कालावधीत हे कार्यक्रम दाखविण्यात येणार आहेत.