मैं थी… मैं हूँ.. . मैं रहूंगी…
– मृणाल घोळे मापुस्कर
हिंदी सिनेसृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री स्मिता पाटील यांचा आज वाढदिवस… स्मिता पाटीलच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेलेल्या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि दैनिक प्रभातच्या लेखिका मृणाल घोळे मापुसकर यांनी करून दिलेला स्मिता पाटीलच्या जीवनाचा परिचय…
स्मिताचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यात झाला. स्मिताच्या आई विद्याताई पाटील या नर्स व समाजसेविका होत्या, तर स्मिताचे वडील शिवाजीराव पाटील हे स्वातंत्र्य सैनिक व एके काळचे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री देखील होते. त्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल 2013 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याच बरोबर स्मिताला दोन बहीण आहेत. या दोन बहिणींच्या मधली बहीण स्मिता.
खरं सांगायचं तर स्मिताचा जन्म तसा कठीण परिस्थितीतच झाला. स्मिताच्या वेळी विद्याताई घरातील साफसफाई करत असताना पाय घसरून पडल्या त्यामुळे त्यांच्या अंगावरून पाणी जाऊ लागले व अशा अवस्थेत 3 आठवडे अगोदरच काहीशा अशक्त व काळ्या सावळ्या वर्णाच्या बाळाचा म्हणजेच, स्मिताचा जन्म झाला मात्र ती खूप हसरी होती त्यामुळे तिचे नांव स्मिता ठेवले.
स्मिता ही आपल्या आईला ‘मा’ म्हणत असे. ती आपल्या ‘मा’ ला सतत चिकटून असे.
स्मिता लहान असताना घरच्या नाजूक परिस्थितीमुळे विद्या ताईंना नोकरी करणे भाग होते, त्यामुळे त्यांना बालवाडीत असणाऱ्या स्मिताला सोडून नोकरीला जावे लागे. अशाच परिस्थितीत एकदा स्मिता “तुझा दवाखाना आणि माझी शाळा पडून जाऊ दे” असे म्हणाली व आपल्या ‘मा’ च्या पायाला येऊन बिलगली. स्मिता ही लहानपणापासूनच अतिशय भावनिक होती त्यामुळे तिला चटकन रडू येत असे. लहानपणी एकदा स्मिताला चिमणीचे मेलेले एक पिल्लू सापडले, त्यासाठी तिने अत्यंत जिव्हाळ्याने मऊ ऊबदार कापसाची गादी तयार केली व त्या पिल्लाला सन्मानाने पुरले.
स्मिताचे शिक्षण मुलींच्या भावे हाय स्कूल म्हणजे आत्ताची रेणुका स्वरूप येथे झाले. शाळेत असल्यापासूनच स्मिता अभ्यासेतर अनेक निरनिराळ्या गोष्टींमध्ये सहभाग घेत असे. तिला मैदानी खेळांमध्ये विशेष रुची होती व नाटकांमध्येही काम करायलाही आवडत असे. ती अत्यंत हरहुन्नरी होती. यानंतर काही काळ ती फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होती परंतु शिवाजीराव मंत्री झाल्याने संपूर्ण कुटुंबाबरोबर स्मितालाही नाईलाजाने मुंबईला जावे लागले, तरीही स्मिताचे पुण्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जोडले गेले होते कारण, तिचे अनेक जवळचे मित्रमैत्रिणी हे पुण्यातच होते. मुंबईला गेल्यावर स्मिताचे पुढील शिक्षण एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले.
स्मिता ही प्रचंड संवेदनशील होती. तिच्या घरातील वातावरणच समाजसेवेचे असल्याने तिला ओघानेच ते बाळकडू मिळाले होते. विशेषतः स्त्रियांच्या समस्यांबाबत ती अतिशय संवेदनशील होती. स्मिताने अवघ्या 11 वर्षांच्या कालावधीत खूप असामान्य काम केले. तिने एवढ्या थोड्या कालावधीत 80हून अधिक चित्रपट केले. तसे बघायला गेले तर स्मिता ही एक अतिशय सर्वसाधारण मुलगी होती. तरुण वर्गात ती इतकी सहज मिसळून जायची की, तिचे अस्तित्व कोणाला जाणवत देखील नसे.
ती ज्या क्षेत्रात काम करत होती त्या चित्रपट सृष्टीमध्ये येण्यासाठी अवश्यक असणारी कोणतीही विशेष सौन्दर्य लक्षणे खरे तर तिच्यात नव्हती, तिला तिच्या सावळ्या रंगाबद्दल न्यूनगंड वाटत असे व जवळच्या मैत्रिणी देखील तिला ‘काळू’ म्हणत असे. छाया चित्रकार “गोविंद निहलानी” यांच्या मते ती सर्वात फोटो जनिक अशी अभिनेत्री होती. तिच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे चुंबकीय आकर्षण होते शिवाय एकदा का ती कॅमेऱ्या समोर उभी राहिली की जादू होत असे.
चित्रपटातील तिच्या भूमिकेत शिरल्यावर मग ती स्मिता राहत नसे, तिच्यात संपूर्णता: ते पात्र भिनलेले असे, मात्र त्या भूमिकेतून बाहेर पडल्यावर ती परत नेहमीची स्मिताच होत असे. स्मिताला असंख्य वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रुची होती आणि ती देखील इतक्या मोठ्या प्रमाणात की, बरेचवेळा तिच्या चित्रपट दिग्दर्शकांना चिंता लागून राहायची की,या अवांतर गोष्टी तिच्या मार्गात येऊन तिचे चित्रपटातील लक्ष विचलित तर नाही ना होणार.. परंतु असे कधीही झाले नाही कारण, एखाद्या गोष्टीत रममाण होणे व गरजेनुसार त्यातून चटकन बाहेर येणे हा कठीण समतोल ती अत्यंत कुशलतेने साधत असे.
स्मिता राष्ट्रसेवा दलात जात असल्याने व सेवादलाची पार्श्वभूमी असल्याने तिच्यासाठी रंगमंच हा काही अनोळखी नव्हता. स्मिताचे ‘दुर्गा झाली गौरी’ हे अतिशय आवडीचे नाटक होते. सेवादलात असताना तिने, सुहास तांबे यांच्या ‘बीज’ नाटकात सर्वप्रथम काम केले होते. स्मिताला वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट बघण्याची खूप आवड होती व विशेषतः गंभीर स्वरूपाच्या चित्रपटात तिला विशेष रस होता. ती बऱ्याच वेळा संध्याकाळी आपल्या मित्रमैत्रिणींसमवेत अत्यंत आत्मियतेने वेगवेगळ्या चित्रपटांच्या स्क्रीनिंगला एफ.टी.आय मध्ये जात असे. स्मिताच्या अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या आवडिंमुळे ती असामान्य ठरली.
स्मिताचे ते पाणीदार डोळे इतके काही बोलून जायचे की तिचे मौनही खूप बोलके व्हायचे. ती केवळ चेहऱ्यानेच बोलत नसे तर तिचे संपूर्ण शरीर अभिनयात समरस होऊन बोलत असे. तिचा तो सावळा रंग, तिच्यावर एवढा खुलून दिसे की, गौर वर्ण असणाऱ्या मुली व नायिकांना देखील तिच्या रंगाचा हेवा वाटवा. तिच्या आवाजातील चढउतार देखील विलक्षण होते. आपल्या कंपीत आवाजातून ती सर्व भाव प्रकट करत असे. स्मिताच्या अभिनयामध्ये नाटकी व दिखाऊ हाव-भावांना काडीमात्र थारा नव्हता.
स्मितामध्ये एकाच वेळी दुःख, राग, प्रेम, आनंद या वेगवेगळ्या छटा अभिनयात रंगवून पात्रे जिवंत करण्याची निसर्गदत्त गुणवत्ता होती. विशेष म्हणजे स्मिता चित्रपटात जितक्या गंभीर भूमिका करायची अगदी त्या विरुद्ध ती खऱ्या आयुष्यात अत्यंत खेळकर होती. ती इतरांना आपल्या विनोदांवर खळखळून हसवायाची. स्मिता ही एक उत्तम, प्रथितयश अभिनेत्री तर होतीच पण त्याच बरोबर ती खूप चांगली माणूसही होती.
स्मिता मुंबईला स्थलांतरीत झाल्यावर एल्फिन्स्टन कॉलेजात एफ.वाय.बीए करत असताना अचानक स्मिताच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. स्मिता दूरदर्शन वाहिनीवर वृत्तनिवेदिका म्हणून झळकली. ती इतके सुंदर वृत्तनिवेदन करत असे की, केवळ स्मिताला बघण्या व ऐकण्यासाठी कितीतरी लोक दूरदर्शन पाहू लागले. अगदी साध्याच परंतु उठून दिसणाऱ्या अशा हातमागाच्या साड्या ती नेसत असे. खरे तर स्मिताला साड्यांपेक्षा पॅन्ट घालायला आवडत असे म्हणून ती घातलेल्या पॅन्टवरच साडी गुंडाळत असे.
वेगळ्या प्रवाहातील संवेदनशील चित्रपट बनवणाऱ्या अनेक दिग्दर्शकांच्या नजरेत स्मिता भरली. अशाच वेळी अरुण खोपकर यांनी ‘तीव्र मध्यम’ या त्यांच्या डिप्लोमा फिल्ममध्ये (लघुपट) स्मिताला घेतले व यानंतर श्याम बेनेगल यांनी त्यांच्या “चरणदास चोर” मध्ये घेतले. तसेच मधली राणी, राजा शिवछत्रपतीमधील सईबाई, मंथन, निशांत, भूमिका अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या माध्यमातून स्मिता रुपेरी पडद्यावर आली.
इ.स. 1970 पासून प्रवाहाच्या विरुद्ध असणाऱ्या चित्रपटांची लाट आली. हे चित्रपट अत्यंत वास्तवदर्षी होते. स्मिता ही या समांतर चित्रपटांची सम्रादनी होती. स्मिताचे नांव काढले की तिच्या या सर्व अद्वितीय भूमिका डोळ्यांपुढे तराळतात. मग ती ‘उंबरठा’ मधली ध्येयाने झपाटलेली व एकत्र कुटुंबात घुसमटलेली स्त्री असो किंवा ‘जैत रं जैत’ मधील प्रेमाला सर्वस्व मानणारी आदिवासी स्त्री असो. ‘चक्र’ मध्ये तिने व्यसनी मुलाच्या विधवा आईची भूमिका केली आहे तर ‘बाजार’ मध्ये ती एक मुस्लिम महिला आहे. ‘मंथन’ चित्रपटात तिने एका दलित गुजराती तापट स्त्रीची भूमिका केली आहे व “मंडी”मध्ये शबाना आझमीबरोबर तिने वारांगनेची भूमिका केली आहे.शबाना व स्मितामध्ये अभिनयाची जुगलबंदी होत असे. सूक्ष्म अशी स्पर्धाही होती पण स्मिताच्या निधनानंतर शबानाने म्हटले होते की, ‘स्मिता समोर नसल्यामुळे काम करण्यातील आव्हानच संपून गेल्यासारखे वाटते.’
स्मिताने हिंदी व मराठी चित्रपटांबरोबरच अनुग्रहम हा तेलगू, भवनी भवाई हा गुजराती, अकालेर संधू,देवशिशू व आश्वमधेर घोडा हे बंगाली आणि अनवेषणे,कोडुरु,चिदंबरम हे मल्याळम असे इतर भाषेतीलही चित्रपट केले. ‘श्याम बेनेगल’ म्हणत असे की, स्मिता ला भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात नेले व तिने तिकडचा वेष परिधान केला की, ती तिकडचीच वाटे. स्मिताला तिच्या मंथन, भूमिका, उंबरठा, जैत रं जैत या व अशा अनेक चित्रपटांसाठी उत्तम अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाले. तसेच 26 जानेवारी 1985 रोजी स्मिताला ‘पद्मश्री’ हा बहूमूल्य मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
स्मिताने शक्ती, नमकहलाल, नजाराना, आखिर क्यों, अमृत असे काही व्यावसायिक चित्रपटही केले. यामधील काही चित्रपटांमध्ये राजेश खन्ना सारखे सुपर स्टार असूनही स्त्री पात्र उजवे ठरणारे चित्रपट केवळ स्मिता मुळेच निर्माण झाले, परंतु व्यावसायिक चित्रपटांमध्ये स्मिता फारशी रमली नाही त्यामुळे ती परत समांतर चित्रपटांकडे वळली.
स्मिताचा राज बब्बर यांच्याशी विवाह झाल्यावर, बाळंतपणात, शरीरात अंतर्गत संसर्ग झाल्याने ती गेली. स्मिता गेल्यानंतर तिचे मिर्च मसाला, डांस-डांस, ठिकाना, सूत्रधार, इन्सानियत के दुश्मन, अहसान, राही, नजराना, आवाम, शेर शिवाजी, वारीस, हम फरीशते नही,आकर्षण व गलियों के बादशहा हे तब्बल 14 चित्रपट प्रदर्शित झाले. स्मिताच्या मृत्यूनंतर तिच्या इच्छेनुसार, तिचे मेकप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी तिला एखाद्या सुवासिनी प्रमाणे तयार केले व तिला निरोप देण्यात आला.
एवढा मान, सन्मान, पैसा, प्रसिद्धी, प्रेम मिळूनही स्मिताचे पाय जमिनीरच होते. शेवटपर्यंत तिने माणूसकीची पूजाच केली व वूमंस सेंटर तर्फे दुःखी, कष्टी, पीडित महिलांसाठी ती काम करत राहीली आणि तिच्या या विलक्षण संवेदनशील गुणांमुळेच ती सगळ्यांपेक्षा वेगळी असूनही सामान्य माणसांच्या मनात घर करून राहिली. स्मिता जाऊन एवढा काळ लोटला तरीही तिची जागा रिक्तच राहिली व राहील..
13 डिसेंबर रोजी आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री स्मिता पाटील हिला जाऊन तब्बल 34 वर्ष उलटली. स्मिताने वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला व चाहत्यांपासून कायमची दूर निघून गेली. काळाच्या ओघाने दुःखाची धार काहीशी बोथट झाली असली तरीही एक खंत व हळहळ तशीच आहे. स्मिताच्या असंख्य संवेदनशील भूमिकांमुळे प्रत्येक व्यक्तीला विशेषत: स्त्रीला, मग ती वयाने कितीही लहान असो अथवा मोठी, तिला स्मिता आपल्या जवळच्या मैत्रिणीसारखी भासते आणि मीही या गोष्टीला अपवाद नसल्याने मी स्मिताला एकेरी नावानेच संबोधते.
– मृणाल घोळे मापुस्कर