मुंबई : दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मुलुंड पूर्व इथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांनी काही काळ राज्य सरकारसाठीही काम केले आहे.
दिल्ली आकाशवाणीवरुन पहिल्या मराठी बातम्या वाचणारे ते निवेदक ठरले. त्याच बरोबर ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक होते. त्यानंतर त्यांनी याच केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिले. केंद्र सरकारच्या सेवेतून मिळालेल्या प्रतिनियुक्तीत राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे ते संचालकही होते.
‘मला भेटलेली माणसे’ हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरला. शिवाय त्यावेळी दूरदर्शनवर असलेला वाद संवाद हा कार्यक्रम मेहेंदळे यांच्या सूत्रसंचालनासाठी प्रसिद्ध होता.
यशवंतराव ते विलासराव, आपले पंतप्रधान यासह १८ हून अधिक पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले आहे. शिवाय त्यांनी काही नाटकांमध्येही काम केले आहे.