जि. प. सीईओंनी बदल्यांबाबत सूचना मागवल्यानंतर चव्हाट्यावर आली वास्तविकता
पुणे – “शिक्षकांच्या बदल्यां’चा विषय आला, की शिक्षक लगेच ऍक्टिव्ह होताना दिसतात. मात्र, ज्ञानदानाचे काम करतानाही शिक्षक “सोशल मीडियावर ऍक्टिव्ह’ असल्याचे दिसून येते. धक्कादायक बाब म्हणजे अनेक शिक्षकांनी सीईओ यांनी फेसबुक पेजवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शाळेच्या वेळेत दिल्याचे दिसून येते. मोबाइल वापरू नये, सोशल मीडियापासून दूर राहावे, असे विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे शिक्षकच सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह असतात हे दिसून येते. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना कितीवेळ शिकवतात? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. त्या संगणकीय बदली प्रक्रियेचा अभ्यास करून त्यात काही सुधारणा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या दोन बैठकाही पुणे जिल्हा परिषदेत झाल्या. ऑनलाइन बदल्यांसंदर्भात आणखी काही शिक्षकांच्या अपेक्षा आहे का? यासाठी समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी फेसबुक पेज तयार केले आहे. त्यावर काही आक्षेप आणि सूचना करण्यास सांगितले आहे. बदल्यांचा विषय आल्यावर शिक्षकांनी फेसबुक पेजवर कमेंन्ट्स केल्या, मात्र त्या शाळेच्या वेळेत.
पटसंख्येवर परिणाम होण्याची शक्यता
शाळेच्या वेळेत मोबाइल आणि समाज माध्यमांपासून दूर राहणे शिक्षकांनी अपेक्षित आहे. मात्र, आयुष प्रसाद यांनी तयार केलेल्या फेसबुकवर विचारलेल्या प्रश्वांवर शिक्षकांनी शाळेच्या वेळेतच उत्तरे दिल्यामुळे शिक्षक ज्ञानदानाच्या वेळेत सोशल मीडियावर दंग असल्याचे पुढे आले आहे. ऑनलाइन बदल्या प्रक्रियेवर अनेककांनी आक्षेप नोंदवले. त्याचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाने समिती नेमली. शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात प्रशासन तप्तर असताना शिक्षक मात्र, ज्ञानदानाच्या वेळेत सोशल मीडियावर वेळ वाया घालवत आहेत. एकीकडे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटत आहे. त्यात जर आहे त्या पटसंख्येला योग्य अध्यापन करणारे शिक्षक मिळाले नाही, तर आहे त्या पटसंख्येवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.