एक लाख जण मारण्याची योजना
नवी दिल्ली : देशात भयानक करोना पसरवून भारतावर फिदायी हल्ला करण्याचा कट तबलिगी जमातने आखला असल्याचा खळबळजनक आरोप उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केला आहे.
हा कट मोदी सरकार अस्थीर करण्यासाठी रचला गेला आणि प्रत्यक्षात हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील कट आहे, असे ते म्हणाले. हा विषाणू पसरवून देशभरात एक लाख लोक मारायचा कट होता, असाही आरोप त्यांनी केला आहे.
जमाती हे वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करून हल्ले करत आहेत. हे करोनाबाधितांवर उपचार थांबवण्यसाठी त्यांचे नीतीधैर्य खच्ची करण्यासाठी केलेले जाणीवपूर्वक कृत्य आहे. त्यामुळे हा देशाच्या विरोधातील कट आहे. त्यात सहभागी झालेल्यांना जरब बसेल, अशी शिक्षा व्हायला हवी, असे ते म्हणाले.
दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील मरकज मशिदीत मेळाव्यासाठी तबलिगी जमातचे सदस्य जमले होते. त्यांच्याकडून केरोनाचा प्रसार होत असल्याचा आरोप होत आहे. देशाच्या विविध भागातील सदस्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला होता. ते घरी परतले तेंव्हा त्यांना करोनाची बाधा झाल्याचे समजले. त्या सर्वांना देशातील विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.