सातारा – जुलै महिन्याचा तिसरा आठवडा आला तरी अद्याप जिल्ह्यात सर्वत्र पाऊस न झाल्याने टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. फक्त माण तालुक्यात 38 गावे, 255 वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जावळी, महाबळेश्वर, सातारा, खंडाळा, पाटण तालुका वगळता अन्य तालुक्यांमध्ये 56 गावे व 273 वाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 77 हजार 33 नागरिक आणि 41 हजार 31 पशुधनाची तहान या पाण्यावर अवलंबून आहे. जिल्ह्यात 24 विहिरी व 27 बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी दिली.
माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यात साधारणत: मार्च महिन्यापासून पाणी टंचाई भेडसावत असते. यावर्षीही माण, खटाव, कोरेगाव, वाई तालुक्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. प्रशासनाच्यावतीने टंचाईग्रस्त गावात तात्काळ पाण्याचे टॅंकर सुरु करण्यात आले होते. दरवर्षी जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. यावर्षी मात्र पावसाने दडी मारल्याने अद्यापही पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. जून महिना संपून जुलै महिन्यातील तिसरा आठवडा सुरु झाला तरी पावसाने दडी मारल्याने अद्यापही अनेक गावात टंचाईची परिस्थिती आहे. माण तालुक्यात 38 गावे 255 वाड्या, खटाव 2 गावे, फलटण 2 गावे, 15 वाड्या, कोरेगाव 3, वाई 6 गावे, 3 वाड्या, कराड तालुक्यात 5 गावे अशा 56 गावे 273 वस्त्यांवर टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावल्याने जावळी, सातारा व महाबळेश्वर, पाटण, खंडाळा तालुक्यातील टॅंकर बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात शासकीय 11 आणि 43 खासगी टॅंकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे गौरव चक्के यांनी सांगितले.