नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्यात आज फोनवरून चर्चा झाली. इस्रायल आणि हमास दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी सागरी सुरक्षेच्या मुद्यावरून दोन्ही देशांना भेडसावणाऱ्या सामायिक मुद्यांवरही चर्चा झाली.
या चर्चेच्यावेळी पंतप्रधान मोदींनी प्रादेशिक शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर पुन्हा प्रस्थापित व्हावी, तसेच युद्धामुळे प्रभावित झालेल्या जनतेला मानवतावादी भूमिकेतून मदत मिळावी, या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार देखील केला.
इस्रायल-हमास युद्धासंदर्भात पंतप्रधान नेतान्याहू यांच्याबरोबर सकारात्मक विचारांची देवाण घेवाण झाली, असे पंतप्रधान मोदींनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अलिकडच्या काळात सागरी वाहतुकीच्या सुरक्षेबाबत धोका निर्माण झाला आहे. इस्रायलच्या विरोधात आणि पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ असलेल्या हौथी बंडखोरांनी लाल समुद्रातून जाणार् या व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ले करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ही वाहतूक धोकादायक बनली आहे. त्या विषयीही पंतप्रधान मोदींनी नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली.