मुंबई – इंडिया आघाडी मजबूत करायची असेल तर या रथाला कोणी तरी सारथी असला पाहिजे अशी सूचना शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे. यंदा आपल्या स्थापनेचा १३८ वा वर्धापन दिन साजरा करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाने स्वबळावर किमान दीडशे जागा जिंकण्याचा संकल्प केला पाहिजे अशी अपेक्षाही ठाकरे गटाने आपल्या पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात व्यक्त केली आहे.
या अग्रलेखात ठाकरे गटाने अधोरेखित केले की नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपच्या अंतिम विजयाचे संकेत देत नाहीत. कॉंग्रेसने इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन मजबूत पर्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे अशी अपेक्षाही यात करण्यात आली आहे. तीन राज्यांच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना सोबत न घेतल्याबद्दलही त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
काँग्रेसला तीन राज्यांत एकट्याने विजयाची चव चाखायची होती आणि त्यामुळेच त्यांनी प्रादेशिक पक्ष आणि आघाडय़ांना वेठीस धरले. काँग्रेसला जिथे स्वबळावर निवडणुका जिंकण्याची शक्यता वाटते, तिथे ती कुणालाही सोबत घेत नाही, असे बोलले जात आहे. आणि या स्वाभिमानातून काँग्रेसने स्वतःचे आणि इंडिया आघाडीचे नुकसान केले, असा दावाही यात करण्यात आला आहे. इंडिया आघाडीच्या रथाला २७ घोडे आहेत पण त्या रथाला सारथी नाही. सारथी नसल्यामुळे, रथ जमिनीत अडकला आहे. आघाडीला एका संयोजकाची गरज आहे असेही ठाकरे गटाचे म्हणणे आहे.
संयोजकाची गरज नाही असे म्हणणारे इंडिया आघाडीचे नुकसान करत आहेत. त्यामुळे या गटाला एक सारथी नियुक्त करणे आवश्यक आहे, त्या संबंधात १९ डिसेंबरच्या बैठकीत निर्णय घेणे आवश्यक आहे. इंडिया आघाडीकडे अनेक अनुभवी आणि शहाणे नेते आहेत, याकडे या अग्रलेखात लक्ष वेधण्यात आले आहे. २०२४ मध्ये इंडिया आघाडीचा चेहरा कोण असेल हे देखील ठरवावे लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.