नवी दिल्ली – अफगाणिस्तानातील सर्व प्रांतात ताबा मिळविल्याचा दावा केल्यानंतर तालिबानने लवकरच सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर तालिबानने चीन, पाकिस्तान, रशिया, ईराण, कतार आणि तुर्की या सहा मित्र देशांना सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं आहे. मात्र भारताशी संपर्क केला नसल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान तालिबानमध्ये असलेल्या चीन, रशिया, तुर्की आणि पाकिस्तानने आपल्या दुतावासातील काम कायम ठेवलं आहे. तर भारताशी तालिबानचा अद्याप संपर्क झालेला नाही. तालिबाननं निमंत्रित केलेल्या सर्व देशांनी आधीपासूनच तालिबानचं समर्थन केलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर तालिबानकडून या सहा देशांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे.
काबुलच्या राष्ट्रपती भवनात तालिबानी सरकार स्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून मुल्ला बरादर यांना तालिबानी सरकारचे प्रमुख म्हणून घोषीत केले जावू शकतं. तर मुल्ला हिब्तुल्ला अखुंददाजा सुप्रीम लीडर म्हणून घोषीत होऊ शकतात.
तालिबानला जगासोबत चांगले संबंध हवे आहेत. तसेच चीन आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा देश असून चीन जगाची आर्थिक शक्ती आहे. अफगाणिस्तानच्या प्रगतीसाठी आम्हाला चीनचं सहकार्य हवं आहे, असंही तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने स्पष्ट केलं आहे.