मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 जणांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयातील या अनागोंदी कारभाराने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. याशिवाय ठाकरे गटाच्या (शिवसेना) सामना अग्रलेखातून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
काय लिहिले सामना अग्रलेखात?
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्युकांड सुन्न करणारे तर आहेच, पण मिंधे सरकारच्या काळात संपूर्ण राज्याची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ‘व्हेंटिलेटर’वर गेल्याचा ढळढळीत पुरावा आहे. 13 ऑगस्टच्या रविवारी एका रात्रीत या रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्युकांडाने महाराष्ट्राला हादरे बसले, पण ठाणे-कळवा ज्यांचे ‘होम ग्राऊंड’ आहे त्या मुख्यमंत्र्यांना ते जाणवायला बहुदा दोन दिवस लागले. सोमवारी रात्री त्यांचे पाय कळवा रुग्णालयाला लागले. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्याने ते म्हणे महाबळेश्वर येथे आराम घेत होते.
तुम्ही तुमच्या प्रकृतीस जपा, हवा तिथे, हवा तेवढा आराम करा, पण आपण जनतेच्या मदतीला कसे लगेच धावून जातो याचे नाटक निदान यापुढे तरी करू नका. ज्या हेलिकॉप्टरने मदतीच्या ठिकाणी तत्काळ गेल्याचे तुम्ही भासविता त्याच हेलिकॉप्टरने महाबळेश्वर येथून कळवा येथे यायला तुम्हाला किती वेळ लागला असता? मृत रुग्णांच्या दुर्दैवी नातेवाईकांचे अश्रूही पुसता आले असते. परंतु हे अश्रू सुकल्यावर मुख्यमंत्री तेथे पोहोचले. नेहमीप्रमाणे त्यांनी उच्चस्तरीय वगैरे चौकशी करण्याचे आदेश दिले. आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने 10 दिवसांत अहवाल द्यावा, असेही सांगितले.
मुख्यमंत्री सरकारचे प्रमुख आहेत आणि आरोग्य मंत्री त्यांच्याच गटाचे आहेत. कळवा रुग्णालयातील मृत्युकांडाचे उत्तरदायित्व त्यांचेच आहे. विरोधकांवर आगपाखड करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांचे कान उपटावेत. प्रश्न कळव्यातील मृत्युकांडाचे आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला कोमात ढकलण्याचे प्रायश्चित्त घेण्याचा आहे. आधी प्रायश्चित्त घ्या आणि मग काय ते बोला! बाकी मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचे राजकीय आरोग्य देखील बिघडलेलेच आहे. ते सुधारण्यासाठी जनतेलाच 2024 मध्ये मोठी ‘शस्त्रक्रिया’ करावी लागणार आहे.
सावंत यांनीही राजीनामा द्यावा
मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावरून तुम्ही खोटी राळ उडवायची आणि कळवा रुग्णालयातील जीवघेण्या ‘सत्या’बाबत विरोधकांनी त्यांचे कर्तव्यही पार पाडायचे नाही. हलगर्जीपणामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा ‘आवाज’ बनायचे नाही. मुख्यमंत्री सरकारचे प्रमुख आहेत आणि आरोग्य मंत्री त्यांच्याच गटाचे आहेत. कळवा रुग्णालयातील मृत्युकांडाचे उत्तरदायित्व त्यांचेच आहे. तेव्हा विरोधकांवर आगपाखड करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांचे कान उपटावेत. 1986 मध्ये जे.जे. रुग्णालयातील 14 मृत्यूंवरून तत्कालीन आरोग्य मंत्री भाई सावंत यांनी राजीनामा दिला होता. ते मृत्यू दोन महिन्यांतील होते. कळवा रुग्णालयातील 18 मृत्यू 24 तासांतील आहेत. त्यामुळे आताच्या ‘सावंतां’नीही राजीनामा द्यायला हवा. ते देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पायउतार करायला हवे, असे ही सामना अग्रलेखात म्हंटले आहे.