नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये 65 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दोन्ही राज्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांमध्ये पावसाचा तांडव पाहायला मिळत आहे. या राज्यांमध्ये भूस्खलन, पूर, ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे येथील पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच या दोन्ही राज्यात शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे हिमाचलमध्ये स्वातंत्र्यदिनाचे कोणतेही कार्यक्रम घेण्यात आले नाहीत. साध्या पद्धतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होते. तर शिमल्यामध्ये भूस्खलन झाल्याने शिव मंदिर कोसळून आत्तापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.
पावसामुळे हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत सुमारे 55 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. अडकलेल्या लोकांची सुटका करण्यावर भर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. चंदीगड-शिमला 4-लेन महामार्गासह इतर प्रमुख रस्ते खुले करण्यात आले आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी 16 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय राजधानीत हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. तसेच कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. या संपूर्ण आठवड्यात दिल्लीत पाऊस पडणार नसून, वातावरण आल्हाददायक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उत्तर प्रदेशात मान्सून अजूनही सक्रिय आहे.