सातारा – महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन विभागाच्या निर्णयानुसार, यंदाच्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा व हवामान आधारीत फळपीक विमा (मृगबहार 2020) या दोन्ही योजना शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्हा बॅंकेशी संलग्न असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या कर्जदार सभासदांनी या योजनेत सहभागी होणे (ऑप्ट इन) व सहभागी न होणे (ऑप्ट आऊट) यासाठी जिल्हा बॅंकेच्या शाखेत शासनाने दिलेल्या विहीत नमुन्यात घोषणापत्र भरून देणे अनिवार्य आहे.
कर्जदार शेतकरी सभासदांनी हे घोषणापत्र भरून न दिल्यास त्या सभासदांना सक्तीने योजनेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जदार शेतकरी सभासदांनी बॅंकेच्या शाखेत योजनेच्या अंतिम दिनांकाच्या 7 दिवस आधी घोषणापत्र भरून द्यावे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.
शासनाने सातारा जिल्ह्यासाठी भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती केली असून या कंपनीमार्फत खरीप हंगामातील भात (तांदूळ), ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद व कांदा या पिकांसाठी विमा योजना लागू केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी कांदा पिकास हेक्टरी संरक्षित रकमेच्या पाच टक्के व इतर पिकांना संरक्षित रकमेच्या दोन टक्क्यांप्रमाणे विमा हप्ता आकारण्यात येणार आहे.
या योजनेत कर्जदार व बिगरकर्जदार सभासदांना सहभागी होण्याची अंतिम तारीख 31 आहे. मृगबहार-2020 या योजनेसाठी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही योजना फक्त डाळिंबासाठी राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी संरक्षित रकमेच्या पाच टक्के विमा हप्ता आकारण्यात येणार आहे.
योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी जिओ टॅगिंग ऍप्लिकेशनवरून काढलेला फोटो द्यावा. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत मंगळवार, दि. 14 जुलै आहे, अशी माहिती आ. शिवेंद्रसिंहराजे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली. अधिक माहितीसाठी बॅंकेच्या मायक्रो फायनान्स विभागाचे उपव्यवस्थापक महेश शिंदे (मो. 9881907567) यांच्याशी संपर्क साधावा.