मेलबर्न – करोनाचा धोका अपेक्षेपेक्षाची जास्त वाढत चालल्याने ऑस्ट्रेलियाने आपल्या देशाच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. त्यांच्या सरकारच्या या निर्णयामुळे येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा संकटात सापडली आहे.
करोनाच्या संकटामुळे ऑस्ट्रेलियाने देशात अन्य देशांच्या तुलनेत जास्त म्हणजे 6 महिन्यांचे लॉकडाऊन जारी केले आहे. त्याची मुदत येत्या 30 सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर 18 ऑक्टोबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत टी-20 विश्वकरंडक स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. मात्र, याबाबत आता आयसीसी व ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ यांच्यात बैठक होणार असून त्यात येत्या ऑगस्ट महिन्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच या स्पर्धेबाबत चित्र स्पष्ट होणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
29 मार्चपासून होणारी आयपीएल जशी बीसीसीआयने 15 एप्रलिपर्यंत पुढे ढकलली होती पण त्यातही बदल करत ही स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केली गेली. तसेच विश्वकरंडक स्पर्धेच्या बाबतीत होऊ नये अशी अपेक्षा आयसीसीने केली असली तरी करोनाचा धोका संपण्याऐवजी दिवसेंदिवस जास्तच गडद होत चालल्याने अनेक स्पर्धांना त्याचा फटका बसला आहे तसे या स्पर्धेबाबत होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ही स्पर्धा आयोजकांसाठी तसेच खेळाडूंसाठी महत्त्वाची आहे मात्र, त्याही पेक्षा लोकांचा जीव जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळे येत्या काळात परिस्थिती सुधारली तरच स्पर्धेबाबत सकारात्मक वार्ता मिळेल, असेही आयसीसीने म्हटले आहे. स्पर्धा मूळ वेळापत्रकानुसारच होईल असे ठाम मत ऑस्ट्रेलिया मंडळाने व्यक्त केले होते. मात्र, आता त्यात बदल केला जाण्याची शक्यताही मंडळाने स्पष्ट केल्याने स्पर्धेबाबतचे कवित्व सुरु होणार आहे. ही स्पर्धा रिकाम्या मैदानात खेळवल्या जाणार असल्याची चर्चा होती.
तिकीट विक्रीचे काय होणार…
विश्वकरंडक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता एप्रिलमध्येच ऑनलाइन तिकीट विक्री सुरु करण्यात आली होती. जर स्पर्धा पुढे गेली किंवा रद्दच झाली तर तिकीटे घेतलेल्या प्रेक्षकांना त्याचे पैसे परत मिळणार का जेव्हा ही स्पर्धा नव्या वेळापत्रकानूसार जाहीर होइल तेव्हा हीच तिकीटे ग्राह्य धरली जातील असा प्रश्न निर्माण झाला आहे.