पिंपरी -पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या 13 जलतरण तलावांपैकी केवळ दोनच तलाव नियमित सुरू आहेत. त्यातील पिंपळे गुरव येथील काळूराम मारुती जगताप जलतरण तलाव वीजपुरवठा खंडित झाल्याने व पाण्याचे फिल्ट्रेशन झाले नसल्याने तोही बुधवारी (दि. 6) बंद होता.
मागील आठवड्यात हे तलाव सुरू करण्यात आले होते. केवळ दोनच तलाव सुरू असल्याने त्यावर मोठा भार येत असून उर्वरित तलाव सुरू करण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. तसेच करोनाचे निर्बंध शिथिल केल्याने नागरिकांची गर्दी जलतरण तलावांवर होत आहे. शहरातील केवळ दोनच तलाव सुरू असल्याने तेथे गर्दी वाढत आहे. क्षमतेपेक्षा जास्त नागरिक येत असल्याने लवकर पाणी अस्वच्छ होत आहे. ते फिल्टर करण्यास कालावधी लागत आहे.
तसेच तलाव पूर्ण भरण्यासाठी साधारणतः 20 लाख लिटर पाणी लागते. त्यामुळे तलाव भरण्यासाठी वेळ लागत आहे. महापालिका प्रशासनाने देखभाल दुरुस्तीची कामे सुरू केल्याने उर्वरित जलतरण तलाव सुरू होण्यास कलावधी लागणार असल्याचे सहाय्यक आयुक्त, क्रीडा अधिकारी सुषमा शिंदे यांनी सांगितले.
सुषमा शिंदे म्हणाल्या की, रात्रीपासून पिंपळे गुरव परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पिंपळे गुरव येथील काळूराम मारुती जगताप जलतरण तलावातील पाण्याचे फिल्ट्रेशन झाले नाही. त्यामुळे तलाव बंद ठेवण्यात आला होता. वीज पुरवठा सुरळीत झाल्यावर पाण्याचे फिल्ट्रेशन होईल व गुरुवारी (दि. 7) नियमित तलाव सुरू राहील.