पिंपरी – करोना महामारीचा जसा आर्थिक क्षेत्राला फटका बसला आहे, तसाच फटका शैक्षणिक क्षेत्रालाही बसत आहे. सुमारे दोन वर्ष मुलांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागले. मागील वर्षी परीक्षा देखील ऑनलाइन झाल्या. परंतु सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मात्र नववीतील अनेक मुले नापास झाल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. ऑफलाइन परीक्षा घेतल्यानंतर या मुलांचा दहावीत निभाव लागणे अवघड असल्याचे दिसून आल्याने त्या मुलांना पुन्हा नववीतच शिक्षण घेण्यास भाग पाडले आहे.
आठवी आणि नववीमध्ये अनेक मुलांनी ऑनलाइन शिक्षणामुळे व्यवस्थित अभ्यास केला नाही. परिणामी पाया कच्चाच राहिला. मुलांना पास करुन दहावीत पाठविल्यानंतर त्यांचा रिझल्ट चांगला येणार नाही आणि शाळेचाही निकाल बिघडेल या भीतीने काही सीबीएसई बोर्डाच्या शाळांनी मुलांचा पाया पक्का करण्याचा निर्णय घेतला.
मुलांच्या मनावर अभ्यासाचे दडपण येऊ नये म्हणून आठवी पर्यंत नापास करायचे नाही, असा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे आपण अभ्यास केला नाही तरी पास होणार असल्याचे विद्यार्थ्यांनाही माहीत आहे. मात्र नववीमध्ये गेल्यावर अनेकांना सुरवातीपासूनच गुण कमी मिळत असतात. तसेच दहावीचा निकाल 100 टक्के लावण्यासाठी अनेक शाळांमध्ये नववीचाही निकाला कडक लावतात. जे विद्यार्थी दहावीत पास होऊ शकणार नाही, त्यांना नववीत नापास केले जाते. तर कधी-कधी आम्ही नववी पासची गुणपत्रिका देतो पण तुम्हाला दहावीसाठी दुसऱ्या शाळेत जावे लागेल, असे स्पष्टपणे पालकांना सांगितले जाते. तर दुसरीकडे दहावीचा पाया भक्कम होण्यासाठी विद्यार्थ्याला त्याच नववीच्या वर्गात ठेवले जाते.
लिखाणाचा वेग मंदावला
गेली दोन वर्षे करोनामुळे शाळा ऑनलाइन सुरू होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची टंगळमंगळ सुरू होती. गृहपाठ नसल्याने अनेकांचा लिखाणाचा वेगही कमी झाला. मात्र आता शाळा सुरू झाल्या आहेत. सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जात आहे. याचा परिणाम आता दिसून येत आहे. सीबीएससी आणि आयसीएससी या बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला असूनमहाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा सध्या सुरू आहे. यातील खासगी शाळातही याच पद्धतीने निकाल लावण्याची शक्यता आहे.
पालकांना आर्थिक फटका
सीबीएससी आणि आयसीएससी बोर्ड असलेल्या अनेक शाळांची फी 50 हजारांहून अधिक आहे. शाळेच्या या निर्णयामुळे पालकांना आर्थिक फटका बसत आहे. पालकांना एक वर्षाची अतिरिक्त फी भरावी लागते, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. एका वर्षात लाखो विद्यार्थी पुढे जात आहेत. तसेच मुलांना आपल्या पालकांकडून बोलणे खावे लागते. परंतु पायाच कच्चा ठेऊन पास केल्यास पुढील शिक्षणात अडचणी येऊन करियरवर परिणाम होऊ शकतो, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.
======================