खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची सपत्नीक ऑनलाईन उपस्थिती
पिंपरी – महासांगितिक कार्यक्रम सर्वांना समाधान आणि आनंद देणारा होऊ दे, अशा भावपूर्ण शुभेच्छा ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी स्वरसागर महोत्सवाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करताना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर देखील उपस्थित होत्या.
पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात 22 व्या स्वरसागर महोत्सवाचे उद्घाटन डॉ. नारळीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर स्वरसागर महोत्सवाचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे, नगरसेविका सुजाता पालांडे, पिंपरी चिंचवड सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल गालिंदे, संयोजक संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाच्या पहिल्या सत्रात निगडी येथील नृत्यकला मंदिरच्या विद्यार्थिनींनी “नमो नटराजा’ हा भरतनाट्यम नृत्याचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात आंगिकन भुवनल यस्य या शिवस्तुतीने करण्यात आली. त्यानंतर पुष्पांजली, नटेश कौतुकम, अभिनयाचे दर्शन घडवणारी पदम ही रचना सादर करण्यात आली. शुद्ध नर्तन सादर करणाऱ्या मतिल्लानाफ नंतर तंजावरच्या शहाजीराजे भोसले यांच्या मन भज शंकर नारायणा या शिव व विष्णू यांच्या एकत्रित शिवमंगलमने या अभिजात भरतनाट्यम नृत्याची सांगता करण्यात आली. गुरु तेजश्री अडीगे यांच्या मार्गदर्शनाखाली रुचाली बोरुले, संस्कृती मगदूम, कुमुदिनी पाटील, सायली काणे आणि अनुजा हिरेकर या नृत्यांगनांनी सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे निवेदन तेजश्री अडीगे यांनी केले.
त्यानंतर दुसऱ्या सत्रात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र आणि शिष्य श्रीनिवास जोशी आणि पंडितजींचे नातू विराज जोशी यांचे शास्त्रीय गायन झाले. यंदाचे वर्ष हे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने स्वरसागर महोत्सवाच्या माध्यमातून पंडितजींना स्वरवंदना अर्पण करण्यात आली. पहिल्या दिवशीच्या सांगतेच्या सत्रात मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वरमार्तंड पंडित जसराज यांचे पट्टशिष्य पंडित संजीव अभ्यंकर यांनी गायन सादर केले. त्यांनी कलावती रागातील तराणा सादर केला. गमकयुक्त गाणे म्हणजे काय याचा सुंदर वस्तुपाठच त्यांनी रसिकांना यावेळी घालून दिला. त्यांनी गायनाची सांगता संत तुकाराम महाराजांच्या “आता कोठे धावे मन’ या अभंगाने केली. या गायन सादरीकरणापूर्वी यंदाचा ज्येष्ठ गायक पंडित पद्माकर कुलकर्णी युवा कलाकार हा पुरस्कार युवा तबला वादक शंतनू देशमुख यांना संजीव अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.