पुणे – “एमपीएससी’ अर्थात राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत होत नसल्याच्या नैराश्यातून स्वप्नील लोणकर या युवकाने आत्महत्या केली आणि राज्यभर शोककळा पसरली. आता या मुलाखतीसाठी सोमवारी यादी जाहीर झाली. त्यात स्वप्नीलने बाजी मारल्याचे दिसून आले. पण, हे यश साजरे करण्यासाठी स्वप्नील आज आपल्यात नाही. त्यामुळे “गड आला, पण सिंह गेला…’ अशीच प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
2019 मध्ये सिव्हिल अर्थात स्थापत्य अभियांत्रिकी पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही अनेक महिने स्वप्नीलला मुलाखतीसाठी कॉल आला नव्हता. प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून आणि उंबरे झिजवूनही स्वप्नील पदोपदी निराशेचा सामना करावा लागत होता. या तणाव आणि आर्थिक विवंचनेतून स्वप्नीलने गंगानगर, फुरसुंगी येथे 29 जून रोजी आत्महत्या केली. या घटनेला आता 6 महिने होत आहेत. तर, घटनेच्या 6 महिन्यांनी जाग आलेल्या एमपीएससी प्रशासनाने ही यादी जाहीर केली आहे. त्यात स्वप्नीलचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्या कारणासाठी त्याने आत्महत्या केली, त्या मुलाखतीच्या यादीत त्याचे नाव आहे.
मात्र, मुलाखतीला जाण्यासाठी स्वप्नील आज आपल्यात नाही. स्वप्नीलने सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी मिळवल्यानंतर तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू लागला. 2019 ची पूर्व आणि मुख्य परीक्षा ही तो उत्तीर्ण झाला. मात्र, मुलाखतीची प्रतीक्षा करतच त्याने मृत्यूला कवटाळले. विशेष म्हणजे, त्याने 2020 मध्येही अशी परीक्षा दिली होती. तीदेखील तो उत्तीर्ण झाला होता. मात्र, करोनामुळे ती मुख्य परीक्षा लांबणीवर पडली. या तणावातूनच आत्महत्या करत असल्याचे स्वप्नीलने मृत्यूपुर्वीच्या चिठ्ठीत लिहले होते.
जबाबदार कोण?
स्वप्नीलच्या मृत्यूनंतर राजकीय नेते आणि एमपीएससीच्या कार्यपद्धतीवर टीका झाली. या मुलाखती वेळेत झाल्या असत्या, तर स्वप्नीलने कदाचित टोकाचा निर्णय घेतलाही नसता. पण, सामान्य कुटुंबांतील युवकांच्या वेदना प्रशासकीय पातळीवर वेळीच पोहचत नाहीत, हे या घटनेतून समोर आले. ज्या मेहनतीने स्वप्नीलने स्पर्धा परीक्षांची तयारी केली, परीक्षा उत्तीर्णही झाला, मात्र मुलाखत होत नसल्याने व नोकरी नसल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नीलचे मुलाखत यादीत नाव येऊनही त्याला व त्याच्या कुटुंबीयांना काय उपयोग झाला? असा प्रश्न आहे.