एकविसाव्या शतकातल्या, विसाव्या वर्षाच्या, पहिल्या दिवसाच्या पहिल्या सूर्यकिरणा… तुझं
मनःपूर्वक स्वागत असो! संक्षिप्त रूपांच्या जमान्यात एवढ्या लांबलचक, पल्लेदार वाक्यानं तुझं स्वागत केल्यामुळं धक्का बसला ना? वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळचा पहिला सूर्यकिरण पाहणारे काही लोक आजही या भूतलावर वास्तव्याला आहेत, हेच तुझं परमभाग्य! ज्यांना एकमेकांशी बोलायला सवड आणि शब्द नाहीत, असे आम्ही तुझ्याशी विस्तारानं काय आणि किती बोलणार?
स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला आपल्या माणसाला देताना आम्ही हल्ली फक्त “टीसी’ म्हणतो. कुणाला धन्यवाद द्यायचे झाले तर “टीवाय’ म्हणतो. एवढंच काय, एखाद्याला अखेरचा निरोप देतानाही फक्त “आरआयपी’ म्हणतो. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, नातं आणि काळजी-चिंता वगैरे व्यक्त करण्याचे भाषा हेच सर्वांत प्रभावी माध्यम असण्याचे दिवस गेले रे बाबा. मुळात या भावनाच हल्ली कधी-मधी येतात आणि जातात. फार काळ आमच्याजवळ राहत नाहीत. फायद्यापुरतं प्रेम आणि उपचारापुरती चिंता हीच आमची रीत बनल्यामुळं भाषाही आम्ही “जीएम, जीएन, एसडी, जीई, एलयू’वर आणून ठेवलीय. आमच्यासमोर येणाऱ्या बहुतांश गोष्टीही हल्ली एनआरसी, जीएसटी, एसआयटी, एनपीआर, सीएबी, सीएए, एनएबी… एबीसी… एक्सवायझेड… अशा नावांनीच येतात. त्यांचे अर्थ आम्ही कुणाला विचारत नाही आणि आम्हाला कुणी विचारू शकत नाही. कारण आम्हाला ते उपयुक्त वाटतीलच किंवा ठाऊक असतीलच असं नाही.
या पार्श्वभूमीवर उगवत्या वर्षाशी चक्क बोलायचं म्हणजे मोठ्ठं धाडसच आहे आमचं. खरं तर आम्ही कामाशिवाय कुणाशी बोलायचंच नाही असं ठरवून टाकलंय. तुझ्याशी बोलतानासुद्धा “यावर्षी आम्हाला काय-काय मिळणार,’ हाच मुद्दा आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा. फाइव्ह-जी नेटवर्क यंदा मिळणार असं आम्ही ऐकून आहोत. खरं तर ते मावळत्या वर्षाच्या अखेरीसच मिळणार होतं; पण कुठे माशी शिंकली समजलं नाही. तू तरी येताना ते घेऊन आलायस का, हा आमचा तुला पहिला सवाल! कारण कंपूत बसल्यावर ज्याची मान खाली जात नाही, जो समोरच्याकडे पाहतो, डोळ्यात डोळे घालून बोलतो, तो उर्मट आहे असं आम्ही मानतो. समूहात गेल्यावर ज्याची नजर आपसूक खाली जाते आणि जो तोंडाऐवजी बोटांनी बोलू लागतो, तोच समाजात राहण्यास लायक! तोच “सोशल’ माणूस! “सोसायटी’ या शब्दाचीच परिभाषा बदलून टाकण्याची चळवळ उभारलीय आता आम्ही. आपल्या राहत्या सोसायटीतसुद्धा कुणी आपल्याला ओळखत नाही असा समाज म्हणजे सोसायटी, ही व्याख्या आम्ही रूढ करत आहोत. त्यासाठी तुझ्याकडून आम्हाला बळ हवंय. सोशल प्लॅटफॉर्म्सचा विस्तार, नवनवीन फीचर्स, ऍप्लिकेशन्स, नवनव्या सिस्टिम्स, दणदणीत फाइव्ह-जी नेटवर्क आणि स्मार्टफोन्स एवढ्याच माफक अपेक्षा आमच्या!
एकदा भोवतालात मनाजोगं तंत्र जुळून आलं की मग प्रत्येक गोष्ट आमच्या भाषेसारखी आखूड आणि आमच्या भावभावनांसारखी अल्पजीवी बनेल. कोणत्याही गोष्टीवर झटपट प्रतिक्रिया नोंदवून आम्ही पुढील विषयाकडे वळू शकू. मग आमच्याकडे मत मागणारा कधीही कुणाहीसोबत गेला, तरी काहीच वाटणार नाही. “सगळेच सारखे’ अशी टिप्पणी करून आम्ही पुन्हा बथ्थड होऊन जाऊ. आमची मतं अधिकाधिक टोकदार करणारे स्वतः कितीही लवचिक झाले, तरी आम्ही “ब्र’ काढणार नाही.