Sushma Andhare । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवरून राज ठाकरे महायुतीत सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बैठकीत काय ठरलं हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. परंतु, यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दोन्ही पक्षावर सडकून टीका केलीय.
माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी मनसे आणि भाजपवर टीका केली. सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जातेय. यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, “कल्याण लोकसभेच्या संदर्भात कार्यकर्त्यांनी ज्या अपेक्षा केल्या आहेत त्यांचा आदर करते. परंतु, मी कोणत्याही जागेसाठी इच्छुक नाही. कल्याण लोकसभेचा उमेदवार २-३ दिवसांत निश्चित कळेल.”असे स्पष्टीकरण त्यांनी दिलीय.
ठिगळ्या ठिगळ्यांची गोधडी म्हणजे भाजपा Sushma Andhare ।
राज ठाकरेंनी अमित शाहांची भेट घेतली. या भेटीबाबत अंधारे म्हणाल्या, “राज ठाकरेंनी कुठे जावं हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपाकडे स्वतःचे नेते शिल्लक राहिलेले नाहीत. फडणवीसांनी एक एक करून त्यांचे सर्व नेते संपवले आहेत. त्यामुळे भाजपाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेकडून नेते आयात करावे लागत आहेत. ठिगळ्या ठिगळ्यांची गोधडी म्हणजे भाजपा असं म्हणावं लागेल”, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
“उद्धव ठाकरे मातोश्रीवर असायचे आणि स्वतः मोदी मातोश्रीवर येऊन बोलणी करायचे. हा फरक आहे. पण इथल्या लोकांना दिल्लीत जाऊन कुर्निसात करावा लागतो”, अशीही टीका अंधारेंनी केली.
पवारांनी साताऱ्यातून निवडणूक लढवावी का? Sushma Andhare ।
पवारसाहेब कुठेही उभे राहिले तरी निवडूनच येणार आहे. त्यांचा विजय सदासर्वकाळ आहे. महाविकास आघाडीतील ते ज्येष्ठ नेते आहेत. पवारांनी पुण्यातून लढण्याला काहीच हरकत नाही. परंतु, निर्णय काय घ्यायचा हे सर्वथा तेच ठरवलीत. कारण ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना सुचवावं तेवढे आम्ही मोठे नाही”, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.