सोलापूर (प्रतिनिधी) – साखर कारखान्यांच्या कर्जासाठी आर्थिक गळचेपी करून इतरांना पक्षात घेतले जात आहे. हे फार काळ टिकणार नाही, अशी टिका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. कॉंग्रेस भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भाजप पक्षात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार जाणार अशी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच सोलापूर भेटीत घोषणा केली होती. त्यावर शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, साखर कारखानदारांची अडचण केली जात आहे. त्यांची कर्जे नियमित करण्याची आशा दाखवून त्यांना भाजप प्रवेश दिला जात आहे. अडचणीमुळे काहीजण पक्षांतर करीत आहेत, पण ते फार काळ टिकणार नाही. ज्यांनी प्रवेश केला त्यांच्या अडचणी सोडविण्यात आलेल्याच नाहीत. त्यामुळे अडचणीत आल्याची भावना त्याच्यात झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे आमदार राजीनामा देतील असे म्हटले होते. मात्र आठवडाभरात एकाही आमदाराने राजीनामा दिला नाही. त्यामुळे त्याच्या म्हणण्यात तथ्य नाही, असेही सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.