रमा जोशी ः आंबेगाव तालुक्यात आरोग्य विभागाला सूचना ः 28 मार्चपर्यंत काम सुरू राहणार
मंचर – आंबेगाव तालुक्यात पुणे-मुंबई आणि परदेशातून आलेल्या व्यक्तींचा सर्व्हे आरोग्य विभागाने मंगळवार (दि. 24) पासुन सुरू केल्याची माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी मंचर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मंचर येथील शरद सहकारी बॅंकेत प्रशासनाच्या वतीने तहसीलदार रमा जोशी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे उपस्थित होते.
कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील हे येथील प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन मिळते, असे सांगून तहसीलदार रमा जोशी म्हणाल्या की, आंबेगाव तालुक्यात करोना व्हायरसचा एकही रुग्ण आढळलेला नाही; परंतु अफवा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
पुणे-मुंबई येथे शिक्षणासाठी असणारे विद्यार्थी, नोकरीसाठी असणारे नोकरदार तसेच व्यवसायासाठी असणारे व्यवसायिक यांची संख्या मोठी आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून पुणे-मुंबई येथे करोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याने अनेकजण माघारी गावाकडे कुटुंबासह येत आहे, तसेच काही नागरिक परदेशात फिरण्यासाठी गेले होते तेहीमाघारी आले आहेत, त्यामुळे करोना संशयित रुग्णांची येथील स्थानिक नागरिकांना लागण होऊ नये,यासाठी आरोग्य विभागाच्या आशा वर्कर, आरोग्य सेवक आणि अंगणवाडी ताई यांना प्रत्येक गावात जाऊन बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांची किंवा परदेशातून आलेल्या नागरिकांची यादी तयार करून आरोग्य विभागास सादर करण्याचे आदेश आंबेगाव तालुका गटविकास अधिकारी जालिंदर पठारे
यांनी दिले.
शनिवार (दि. 28) पर्यंत हा सर्व्हे बहुधा चालेल, त्यामध्ये नवीन आलेले नागरिक कधी आलेत याची माहिती घेऊन प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य विभाग दक्षता घेत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. समाज माध्यमांवर चुकीची माहिती टाकू नये. विनाकारण बाहेर पडू नये, अन्यथा पोलीस कारवाई करतील.
– कृष्णदेव खराडे, पोलीस निरीक्षक, मंचर