मंचर -आंबेगाव तालुक्यत खबरदारीचा उपाय म्हणून 49 हजार 268 कुटुंबातील 2 लाख 27 हजार 58 जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. कुटुंबांचे सर्वेक्षण सुमारे दीड हजार शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले, अशी माहिती सभापती संजय गवारी यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यात रविवार (दि. 10) नंतर मुंबई, पुणे व इतर शहरातून आलेल्या 1884 व्यक्ती आहेत. त्यापैकी सर्दी, ताप, खोकला असणाऱ्यांची संख्या 74 आहे. तालुक्यात 60 वर्षांवरील पुरुष व स्त्रियांची संख्या 34 हजार 550 आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनी आजार, क्षयरोग (टीबी), कुष्टरोग, कॅन्सर असणारे 9 हजार 858 नागरिक आहेत, त्यापैकी शासकीय दवाखान्यात 3 हजार 231 तर खासगी दवाखान्यात 6 हजार 605 नागरिक उपचार घेत आहे, अशी माहिती तालुका स्तरावर संकलित करण्यात आली आहे.
या माहितीच्या आधारे आजारी व करोनाविषयी प्राथमिक लक्षणे असणाऱ्या व्यक्तींवर योग्य उपचार करण्यात येणार आहे. शहरी भागातून तालुक्यात मोठ्या संख्येने नागरिक येऊ लागल्याने करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा येणाऱ्या लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून गावातील शाळा, समाजमंदिर यामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने क्वॉरंटाइन करण्यात येत आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेश ढेकळे यांनी दिली.
गटविकास म्हणाले की, जालिंदर पठारे म्हणाले की, सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पर्यवेक्षण अधिकारी म्हणून 54 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये करोनाविषयक कुटुंब व बाहेरून आलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण करून कुटुंब प्रमुखाचे नाव, मोबाइल नंबर, एकूण व्यक्तींची माहिती घेतली आहे.