शास्त्रज्ञ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक धांदरट, स्वत:शीच बोलण्यात मग्न किंवा रागीट, उद्धट आणि आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणारी अशी व्यक्ती उभी राहते. माझ्याही पाहण्यात काही असे शास्त्रज्ञ आले. परंतु अशा सगळ्या कल्पनांना छेद देणारे शास्त्रज्ञ आणि एक उमदं व्यक्तिमत्त्व म्हणून सुरेश नाईक समोर आले तेव्हा मनाचीच प्रसन्नता वाढली आणि मला एक मोठ्या मनाचे मित्रही मिळाले. माझी इंग्रजीत लिहिलेली “अवर डिस्टंट कझिन्स’ ही विज्ञानकाल्पनिका या स्वरूपाची कादंबरी 2013मध्ये एका जर्मन प्रकाशनसंस्थेनं प्रसिद्ध केली. तेव्हापासून तिचं मराठी रूपांतर प्रसिद्ध करण्याबाबत विचारणा होऊ लागल्या. अखेर आश्लेषा महाजन यांनी तिचं “अतिदूरचे बांधव’ असं शीर्षक असलेलं मराठी रूपांतरण केलं आणि मनाक्षरे प्रकाशनानं ते प्रसिद्ध करायचं ठरवलं.
प्रकाशन समारंभ पुण्यातील पत्रकार भवन इथं करण्याचं ठरलं. विज्ञानकाल्पनिका भविष्यातील मंगळमोहिमेवर बेतलेली आहे. पुण्यातच राहणारे भारतीय अवकाश संशोधन संस्था-इस्रोचे निवृत्त संचालक सुरेश नाईक यांचं नाव प्रकाशनासाठी पुढं आलं. एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञाची गाठ घेऊन त्यांना त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यासाठी निमंत्रित करण्यासाठी कुणी पुढं होईना. मी स्वत: थोडाफार संशोधक असल्यानं ही कामगिरी मी अंगावर घेतली. त्यांना फोन करून त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यांचं दिलखुलास प्रसन्न व्यक्तिमत्त्व सामोरं आल्यावर माझं काम खूपच सोपं झालं. सुरेश नाईक व त्यांच्या अर्धांगिनी यांनी कार्यक्रमाला एक वेगळाच आयाम आणला.
पुस्तक नाईक सरांनी काळजीपूर्वक वाचलं होतं. प्रकाशन करताना ते आपल्या भाषणात म्हणाले, मूळ लेखकानं (म्हणजे मी) मंगळमोहिमेच्या अंतराळ-प्रवासाचं चित्रण केलं आहे ते विज्ञानाला धरून आहे की नाही याचा शोध मी घेतला. ज्या तारखेला अंतरिक्षयान मंगळाच्या दिशेनं सोडलं जातं ती तारीख अतिशय महत्त्वाची असते. या तारखेला इंग्रजीत “लॉंच विंडो’ म्हणतात आणि ती काटेकोरपणे पाळावी लागते नाहीतर किमान दोन वर्षं तरी त्या संधीची वाट पाहावी लागते. मात्र लेखकानं भविष्यातील जी तारीख कादंबरीत दाखवलेली आहे ती अंतरिक्ष-गणिताप्रमाणे अगदी बरोबर आहे एवढंच नव्हे तर मंगळाहून पृथ्वीवर येण्याकरता जी तारीख दाखवली आहे तीसुद्धा गणिताप्रमाणं अचूक आहे. थोडक्यात, नाईक सरांनी विज्ञान-काल्पनिकेसाठी आवश्यक अभ्यासाची माझी तयारी योग्य असल्याची ग्वाही दिली.
मला खूप समाधान वाटलं आणि मी ते माझ्या भाषणात बोलूनही दाखवलं. अचूक लॉंच विंडोसाठी मी सुमारे दोनशे वर्षांच्या कालावधीतील पृथ्वी आणि मंगळाच्या कक्षांचं गणित मांडलं होतं. त्याशिवाय अमेरिकेतील नासा संस्थेतील शास्त्रज्ञांनी ही तारीख तपासून योग्य असल्याचं कळवलं होतं. मात्र मंगळावरून पृथ्वीकडे येण्यासाठी मी जी भविष्यातील तारीख योजली होती तीत गफलत होती. मी पुन्हा गणित मांडून ती दुरुस्तही केली होती. नाईक सरांनी माझ्या प्रयत्नांना दाद दिली. याशिवाय अंतराळ प्रवासातील यात्रींसाठी दाखविण्यात आलेल्या जीवनाधार-प्रणालीचंही त्यांनी विज्ञानाधिष्ठित असल्याचं सांगून कौतुक केलं. माझा नाईक सरांबद्दलचा आदर शतगुणित झाला.
पुढील एका भेटीत मी त्यांना माझ्या पूर्णपणे हरित आणि प्रदूषणविरहित इंजिनाच्या संकल्पनेबाबत माहिती दिली. त्यांना माझी संकल्पना खूप आवडली आणि आजच्या प्रदूषण तसंच जागतिक उष्मीकरण या समस्यांवर हे इंजिन म्हणजे रामबाण उपाय आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याशिवाय त्यांच्या काही निवृत्त शास्त्रज्ञ मित्रांचंही या बाबतीतलं मत मिळवून त्यांनी संकल्पनेचा मी पाठपुरावा करावा असं सुचवलं. त्यांच्या सूचनेनुसार मी माझ्या संकल्पनेवर शास्त्रीय लेख लिहिला. तो दोन ख्यातनाम आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांनी मला या विषयावर पत्रकार परिषद घेण्याविषयी सुचवलं आणि एवढ्यावरच न थांबता त्या पत्रकार परिषदेला संबोधित करून माझ्या संशोधनाविषयी जागृत केलं. त्यामुळे वृत्तपत्रांनी माझ्या संशोधनाची दखल घेऊन त्याविषयीच्या बातम्या प्रकाशित केल्या.
आज माझ्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी काही उद्योजक आणि तज्ज्ञ पुढे आले आहेत. संकल्पनेवर काम चालू आहे आणि पहिल्या प्रयोगांनी अपेक्षेपेक्षाही चांगले निष्कर्ष दिले आहेत. काही वर्षांत मी व माझी टीम जगाला प्रदूषणविरहित इंजिन देऊ शकू असा आमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. हे सर्व नाईक सरांच्या प्रोत्साहनामुळेच घडलं आहे.
नाईक सरांचं कार्य आणि त्याचा आवाका खूप मोठा आहे. इस्रो बाल्यावस्थेत असल्यापासून उपग्रह बनवण्याचं काम त्यांनी नुसतं सांभाळलंच नाही तर त्यात जागतिक पातळीवरची उच्च क्षमता मिळवली आहे. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा आज केवळ अविकसित देशच नव्हे तर सिंगापूरसारखे विकसित देशही घेत आहेत. असा कामाचा आंतरराष्ट्रीय आवाका आणि अतिशय व्यस्त असं जीवन निवृत्तीनंतरही स्वीकारलेले सुरेश नाईक आजही विद्यार्थ्यांमध्ये रमतात आणि मार्गदर्शन करतात. अनेक महाविद्यालयांनी आणि विद्यापीठांनी त्यांच्या मदतीनं उपग्रह बनवून अवकाशात सोडलेले आहेत. अगदी शाळेतल्या मुलांसाठीही ते व्याख्यानं आणि कार्यशाळा घेतात.
नाईक सर हे सतत कार्यमग्न असतात याचं कारण म्हणजे ते विविध संस्थांमध्ये पदाधिकारी आहेत. आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष संस्थेचे तसंच विज्ञान-भारती यांचे ते अध्यक्ष आहेत तर राष्ट्रीय अंतरिक्ष संस्थेच्या भारतीय विभागाचे ते प्रमुख आहेत. दूरसंदेशवहन या क्षेत्रातील ते तज्ज्ञ आहेत आणि संयुक्त राष्ट्रसंघाची शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी ब्रिटिश एअरोस्पेस या संस्थेत कामही केलेलं आहे. या सगळ्याचा फायदा नवीन पिढीला मिळावा यासाठी ते तरुणांच्या नवकल्पनांना उत्तेजन देण्यासाठी परीक्षक म्हणून काम पाहतात. डॉ. अब्दुल कलाम आणि डॉ. गोविंद स्वरूप यांच्याप्रमाणेच सुरेश नाईक सरांकडूनही मला खूप ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळतं हे मात्र निश्चित.
श्रीनिवास शारंगपाणी