पिंपरी – दिवाळीपूर्वीच शहराचे आरोग्य बिघडत होते. प्रदूषण वाढत असताना उपाययोजना हाती घेण्यास सुरुवात झाली. परंतु या उपाययोजना तोकड्या पडल्या आणि लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांच्या धूमधडाक्याने शहरात प्रदूषणाने धोकादायक पातळी ओलांडली. शहरातील भोसरी, निगडी, भूमकर चौकातील हवेची गुणवत्ता सर्वात खराब श्रेणीत गेल्याची बाब समोर आली आहे. यामुळे घराबाहेर पडू नका, जास्त व्यायाम करु नका, खिडक्या बंद करा आणि बाहेर पडावेच लागले तर मास्क वापरा अशा सूचना शासकीय यंत्रणेकडून नागरिकांना देण्यात येत आहेत.
दिवाळीनिमित्त फोडण्यात येणारे फटाके, वाहनांचा धूर, बांधकामांमुळे शहरातील हवेची पातळी धोकायदाक झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरातील विविध भागातील सुरू असलेली सर्व बांधकामे काही दिवस बंद ठेवण्याचा प्रशासन विचार करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) सफर या संकेतस्थळाच्या माध्यमातून ही नोंद झाली आहे. अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम 2.5) आणि सूक्ष्म धूलिकणात वाढ झाल्याने शहराच्या काही भागातील हवेची गुणवत्ता चक्क खराब श्रेणीपर्यंत पोचली होती. सफर या संकेतस्थळाच्या नोंदीनुसार भोसरीत 394, निगडीत 338 तर वाकडमधील भूमकर चौकात 306 (एक्यूआय) वाढला होता. या तिन्ही भागातील हवेची गुणवत्ता सर्वात खराब श्रेणीत नोंदली गेली आहे. रविवार सायंकाळपासून प्रदूषण वाढण्यास सुरुवात झाली, सोमवारी सायंकाळी यात काहीशी सुधारणा झाली असली तरी धोकादायक पातळीवरच हवेची गुणवत्ता होती.
लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशीच्या दिवशी शहरातील सूक्ष्म धूलिकणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि हवेची गुणवत्ता इतकी खालावली की शासकीय यंत्रणांना सावधनेतचा इशारा द्यावा लागला.
हिवाळ्यात जमिनीवरील धूलिकण हवेत जाऊन हवा प्रदूषित होते. त्यात फटाक्यांची भर पडत आहे. त्यामुळे शहरातील हवेची पातळी धोकादायक श्रेणीत गेली आहे. शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने 32 प्रभागांमध्ये 16 वायू प्रदूषण नियंत्रण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांद्वारे प्रभागातील बांधकाम स्थळांना भेटी देऊन छायाचित्रे, चित्रफितीद्वारे त्याची नोंद घेण्यात येत आहे. या दरम्यान प्रदूषण नियंत्रण तरतुदींचे पालन न केल्याचे उघड झाल्यास दंड आकारला जात आहे. नोटीस देऊन कामाची जागा सील केली जात आहे. दैनंदिन वायू प्रदूषण निरीक्षण केले जाते. शहरातील ढाबा, बेकरी, रेस्टॉरंट आणि हॉटेल्स मालकांनी स्वयंपाकघरात पर्यावरणपूरक पर्यांयांचा वापर करावा. तसेच डिझेल जनरेटरचा वापर करण्याचे शक्यतो टाळावे. शहरातील हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उद्योगांच्या वायू प्रदूषणावरही बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
आरोग्याच्या समस्याही वाढू शकतात
शहरातील हवेची गुणवत्ता ढासळून खराब श्रेणीत आल्याने प्रदुषणाची समस्या वाढली आहे. थंडीच्या काळात हवेचा वेग ही मंदावतो, परिणामी जमिनीलगतचे तापमान कमी असल्याने हवेतील प्रदूषणाचे धूलिकणदेखील जमिनीलगतच्या थरात राहतात. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत हवेची गुणवत्ता खराब होते. हिवाळ्यात आधीच सर्दी खोकल्याचे आजार उद्भवतात, त्यात आता हवेची गुणवत्ता ढासळल्याने आरोग्याच्या समस्या देखील वाढू शकतात.
काय काळजी घ्यावी
प्रदूषित हवेत जास्त काळ राहणे टाळा
बाहेरील शारीरिक श्रम अथवा व्यायाम टाळा
बाहेर जाताना मास्कचा वापर करा
लहान मुले, वृध्दांची काळजी घ्या
श्वसनाचा त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या
फटाक्यांसह आदी बाबींमुळे शहरातील काही भागाची हवेची पातळी खालावली आहे. पालिकेच्या वतीने विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी रस्त्यांची रोड वॉशर सिस्टीम असलेल्या दोन वाहनांद्वारे साफसफाई करण्यात येत आहे. मुख्य चौकांचे हवा प्रदूषण कमी करण्यासाठी मूव्हेबल फॉग कॅनन डस्ट सप्रेशन प्रणाली 5 नवीन वाहनांवर बसविण्यात आली आहे. त्याव्दारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग