Supriya Sule : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला मराठवाड्यातील बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत हिंसक वळण लागले आहे. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंखे यांच्या घरांची जाळपोळ झाली. त्यानंतर बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागच्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. परंतु, सरकार पातळीवर ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यातच काल उपसमितीच्या बैठकीतही ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर, दुसरीकडे अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. तसंच, आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न असून जाणीवपूर्वक असे प्रकार घडवून आणले जात आहेत का याबाबत मराठा समाजाने सजग असायला हवं असंही म्हटलं. तसंच, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही असाच रोख व्यक्त केला आहे.
राज्यात काही ठिकाणी अज्ञात व्यक्ती सार्वजनिक मालमत्ता, बसची जाळपोळ, तोडफोड करीत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. माझे नागरीकांना नम्र आवाहन आहे की कृपया आपण सर्वांनी संयम ठेवावा व शांतता राखावी. आरक्षणाचे आंदोलन विधायक मार्गाने सुरु आहे. त्याला…
— Supriya Sule (@supriya_sule) October 30, 2023
“राज्यात काही ठिकाणी अज्ञात व्यक्ती सार्वजनिक मालमत्ता, बसची जाळपोळ, तोडफोड करीत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. माझे नागरीकांना नम्र आवाहन आहे की कृपया आपण सर्वांनी संयम ठेवावा व शांतता राखावी. आरक्षणाचे आंदोलन विधायक मार्गाने सुरू आहे. त्याला गालबोट लावण्याचे प्रयत्न काही लोक करीत आहेत. माझे मनोज जरांगे पाटील यांना नम्र विनंती आहे की, त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी”, अशी पोस्ट सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) केली आहे.
दरम्यान, यवतमाळमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या फलकांना डांबर फासण्यात आले. धाराशिव येथे पालकमंत्री तानाजी सावंत, भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या छायाचित्रांना काळे फासण्यात आले. गंगापूर येथे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. जालना जिल्ह्यात राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली.