पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) कडून 25 ऑक्टोबरपासून पुणे ते नागपूर अशी 800 किलो मीटरची पायी युवा संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा 430 गावातून जाणार असून भाजपच्या 30 सरपंचानीही यात्रेला पाठिंबा दिला असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (दि.17) पत्रकार परिषदेत केला.
पिंपरी, मोरवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या असंघटित कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर आझम पानसरे, प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर, शहर प्रवक्ते माधव पाटील आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, दि. 25 ऑक्टोबरपासून तुळापूर येथून पायी पदयात्रेला सुरुवात होणार असून 45 दिवस 430 गावे, दहा जिल्हे 28 तालुके असा प्रवास असणार आहे. 200 लोक यात्रेत चालणार असून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबरला यात्रा नागपूरला पोहचणार आहे. अभियंता, स्पर्धा परीक्षा दिली पण नोकरी नाही. विद्यार्थी, पालकांचा संघर्ष सुरू आहे. तलाठी पदासाठी 22 ते 30 लाख रुपये मागितले जात आहेत. पैसे भरून अधिकारी होणारा कधीही जनतेची कामे प्रामाणिकपणे करू शकत नाही. युवकांचे, लोकांच्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवत आहेत. सर्व पक्षाच्या खासदार, आमदारांना पत्र दिले आहे. कोणीही यात्रेत सहभागी होऊ शकतो. त्यामुळेच यात्रेच्या मार्गावरील 30 गावातील भाजपच्या सरपंचानी यात्रेला पाठिंबा दिल्याचा दावा आमदार पवार यांनी केला आहे.
आमदार पवार पुढे म्हणाले, नांदेड जिल्हा रुग्णालयात लहान मुलांचा, नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेडला गेले नाहीत. त्याऐवजी ते दिल्लीला गेले. सध्याची राजकीय परिस्थिती खालावली आहे. आमदार अपात्रतेबाबत अध्यक्ष कोणताही निर्णय घेणार नाहीत. न्यायालयातूनच आमदारांना अपात्र केले जाईल.
“त्या” चर्चेला किती महत्व देणार?
बारामतीमधून पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. बारामती महायुती जिंकणार असा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या दाव्यावर आमदार पवार म्हणाले, चर्चेला किती महत्व द्यायचे, नागपूरमध्ये लोकसभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. गडकरी वगळता भाजपच्या उमेदवाराचा पराभव होईल अशी तिथे चर्चा आहे. त्यामुळे चर्चेला काही महत्व नाही. त्यांच्यातही वेगळा संघर्ष सुरू झाला आहे. कोणाचे पालकमंत्रीपद काढले आणि कोणाला दिले यावरून संघर्ष दिसत असल्याचा टोलाही आमदार पवार यांनी लगावला.