तळेगाव दाभाडे, {मनोहर दाभाडे} – अंगाची लाहीलाही करणारा असह्य उन्हाळा आणि गावोगावी दाही दिशा वणवण फिरायला लावणारी तीव्र पाणीटंचाई असल्याने पुणे, मुंबईस्थित चाकरमान्यांनी यंदा आपल्या गावाकडे पाठ फिरवली आहे, तर टंचाईमुळे मुंबईतही पाणी कपात सुरू झाल्याने चाकरमान्यांनी गावाकडील मंडळीला उन्हाळी सुटीसाठी रेड सिग्नल दाखविला आहे. त्यामुळे विशेषतः शाळकरी मुलांच्या आनंदावर विरजण पडत आहे.
अठरा विश्व दारिद्र्य आणि पाचवीला पुजलेला दुष्काळ यावर मात करून पोटाची खळगी भरण्यासाठी मावळ तालुक्यातील अनेकांनी पुणे, मुंबई गाठली. मिळेल तो कामधंदा वा व्यवसाय करीत तिथेच ते स्थिरावले आहेत. रात्रंदिवस धावपळ, मेहनत करीत त्यांनी तेथेच संसार उभे केले आहेत. दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून काही काळ विरंगुळा मिळावा. यासाठी ते उन्हाळ्यात हमखास गावाकडे येत असतात.
मुलांच्या शाळांना सुटी लागताच सहकुटुंब गावाकडे येण्याचे त्यांचे नियोजन करीत असतात. गावाकडील आई-वडील, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र परिवाराला भेटून संवाद साधत असतात. गाव कट्ट्यावर, पारावर बसून नानाविध विषयावर चर्चा करीत, गावकऱ्यांच्या सुख-दुःखाचीही विचारपूस करीत असतात. गावाकडील यात्रा, जत्रा, लग्न समारंभ, गृहप्रवेश, धार्मिक कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमांना ते आवर्जून हजेरी लावत असतात.
गावाकडील वृद्ध आई-वडिलांसह कुटुंबीयांना सोबत घेऊन जवळच्या तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळांना भेटी देत असतात. शेतमळ्यातील विहिरीमध्ये मुलांसह डुंबण्याचा आनंद घेत असतात. विशेष (स्पेशल) जेवणाचा बेत करीत असतात. रोजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या आणि धावपळीच्या दुनियेतून दूर होत शांतता, निवांतपणा आणि आनंदाचे सुखद चार क्षण मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र, यंदा तीव्र पाणी टंचाई आहे. पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे. कामधंदा सोडून टँकरची वाट पाहत बसावे लागत आहे. शेत पाण्याअभावी उजाड, भकास झाली आहेत. ओसाड माळरान उन्हाने तव्यासारखी तापत आहेत. त्यावरून येणारी वाऱ्याची झुळूकही वाफेसारखी अंगास भाजत आहे. उष्मा वाढून दिवसभर अंगाची लाहीलाही होत आहे.
त्यामुळे घरात थांबवेना आणि घराबाहेर पडवेना. अशा परिस्थितीने लोक त्रस्त झाले आहेत. अजूनही काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडलेला नाही. त्यामुळे लोकांसोबत जनावरांचेही हाल होत आहेत. अशा टंचाईच्या परिस्थितीत गावाकडे गेल्यास अनेक अडचर्णीचा सामना करावा लागणार असल्याने चाकरमान्यांनी गावाकडे पाठ फिरविली आहे.
मतदानालाही मुकले
अनेकजण पुणे-मुंबई सारख्या शहरात राहत असले तरी त्यांचे मतदान मात्र गावाकडे असतो. मात्र यंदा पाणी टंचाई असल्याने ते गावाकडे आलेच नाहीत. केवळ एक दिवस मतदानासाठी गावाकडे येणे आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.