उमेदवारीवर शिक्कामोर्तब नसल्याने पक्षश्रेष्ठींच्या घोषणेकडे लक्ष
राजकीय हौसे-नवसे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते. तो क्षण आला अन् शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर करून राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजविला. निवडणुकीची तारीख जाहीर झाली तरी उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब नसल्याने मातब्बरांसह इच्छुकांच्या “टिक टिक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यात’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी कोणाची वर्णी लावणार अन् कोणाला डावलणार, हे लवकरच जाहीर होणार असल्याने इच्छुकांसह मातब्बरांचे ठोके वाढले आहेत.
पुणे जिल्ह्यात (ग्रामीण भाग) बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर-हवेली, शिरूर-हवेली, खेड-आळंदी, आंबेगाव, जुन्नर, भोर-वेल्हे-मुळशी या नऊ मतदारसंघांचा समावेश आहे. ही नऊही मतदारसंघ तशी सधन असून अनेक मतदारसंघात राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढणाऱ्यांमध्ये मोठी रस्सीखेच असल्याने कोण “बंडखोरी’ करणार अन् त्यामुळे कोणाला फटका बसणार याबालबतचे चित्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी स्पष्ट होईल मात्र, तोपर्यंत “बंडखोरी’ पीक जोमाने फुलणार यात कोणाचेही दुमत नाही.
खेड-आळंदी : मतदारसंघाकडे लक्ष लागले असून इतर सर्व मतदारसंघापेक्षा याठिकाणी सर्वाधिक इच्छुकांची फौज आहे. तरी ही सर्व फौज राष्ट्रवादीमध्येच आहे. युती झाल्यास भाजपने हा मतदारसंघ मागितला असला तरी विद्यमान आमदार शिवसेनाचा असल्याने भाजपकडे जाणे कठीण आहे. तरी भाजपचे इच्छुक बंडखोरी करून तिसरा पर्याय देणार का? अन् राष्ट्रवादी माजी आमदारांवरच भरोसा दाखवणार की नवीन चेहऱ्याला संधी देणार, हे येणारा काळच ठरवेल.
आंबेगाव : मतदारसंघात कायम राष्ट्रवादी-शिवसेना असाच सामना होतो. त्यात राष्ट्रवादीचे पारडे जड राहिले आहे. यंदा शिरूर लोकसभा मतदारसंघात परिवर्तन घडले आहे. त्यामुळे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात यंदा परिवर्तन घडणार, असा विश्वास माजी खासदार शिवाजीराव आढळरावांनी घोषित केले असले तरी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांना तोडीस तोड उमेदवार देण्याचे शिवसेनेपुढे आव्हान राहणार आहे.
जुन्नर : यंदा येथे मोठी चुरस होणार आहे. कारण राज्यातून मनसेचा एकमेव आमदार येथून निवडून आला होता. मात्र, लोकसभेआधी त्यांनी घरवापसी करीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक नाराज असून त्यांनी आवाज उठवल्याने आशा बुचके यांची हाकलपट्टीही करण्यात आली आहे. तर दुसरीकडे यंदा हा मतदरसंघ आघाडीत कॉंग्रेसकडे केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नंतर ते फोल ठरल्याचे सांगितले असले तरी शिवसेनेला तोड देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीपैकी कोणीही उमेदवार उभा राहिल्यास अतुल बेनके (राष्ट्रवादी)-सत्यशील शेरकर (कॉंग्रेस) आम्ही एकदिलाने काम करू, असा संदेश मध्यंतरी दिला आहे. तर सध्या कुकडी कार्यालय नगरला नेण्यावरून येथील पाणीप्रश्न पेटला असल्याने सध्याचे भावनिक वातावरण आणि आशा बुचके यांची भूमिका हे आजी आमदारांपुढे मोठे आव्हान असणार आहे.