कोलकाता विमानतळ बंद 12 तासांसाठी बंद
1 लाख नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
नवी दिल्ली : बुलबुल चक्रीवादळ शनिवारी रात्री पश्चिम बंगालमधील सागर बेटे आणि बांगलादेशातील खेपुपारा यामध्ये धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर ते बांगलादेशातील सुंदरबन या त्रिभूज प्रदेशाकडे सरकणार असल्याचा अंदाज कोलकातामधील हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, बुलबुल चक्रीवादळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात पुढील 12 तासांत हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
चक्रीवादळ धडकल्यानंतर त्याचा वेग 110 ते 120 कि.मी. प्रतितास असेल आणि त्यासोबत ताशी 135 कि.मी. वेगाचे वारेही वाहतील, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. शनिवारी सायंकाळी पश्चिम आणि पूर्व मिदनापोर, दक्षिण आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 80 ते 90 कि.मी. इतका होता तो ताशी 110 ते 120 इतका वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादळाच्या पार्श्वभूमीवर स्वत: मुख्य नियंत्रण कक्षात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून 12 तासांसाठी कोलकाता विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. तसेच किनारपट्टीशेजारील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस कोसळून पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये प्रत्येकी एक जण ठार झाल्याचे वृत्त आहे. पश्चिम बंगालच्या तटवर्ती क्षेत्राला मुसळधार पावसाने झोडपले, वृक्ष उन्मळून पडले आणि त्यामुळे कोलकाता शहरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर ओडिशात भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील 12 तासात पुर्व आणि पश्चिम मदीनापूर, हुगळी, हावरा, नदीया या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 36 तासांमध्ये दक्षिण आसाम, मिझोराम आणि मेघालयमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.