-शिवानी पांढरे
सोशल मीडियामुळे आपले आयुष्य बदलले आहे. सोशल मीडियाचे जसे फायदे आहे तसे तोटेही आहेत. कारण कोणत्याही गोष्टीचं व्यसन हे घातकच असते.
तरुणांनी सोशल मीडियाकडे आव्हान म्हणून पाहिलं, त्यांनी ते स्वीकारलं आणि आता त्यातून अनेक तरुण मंडळी रोजगार मिळवतानाही दिसत आहे. बदलत्या काळानुसार तरुण बदलले आणि त्यांनी स्वतःच रोजगार उभा केला. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून रोजगारच नाही तर प्रसिद्धीसुद्धा मिळवली. आपल्यात असलेले गुण, आपल्याला येत असलेली कला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सादर केली जाते. तसेच शर्टची घडी करण्यापासून ते स्वयंपाकापर्यंतच्या इतर गोष्टीही आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून शिकत आहोत. एखादी लहान गोष्टीही आपल्याला प्रचंड मोठं करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोशल मीडिया.
आपल्या नकळत सोशल मीडियाचा आपल्या वागण्यावर आणि मानसिकतेवर परिणाम झाला आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीत तुलना करण्याची सवय निर्माण झाली. एका अर्थी ती योग्य आहे, मात्र ही तुलना आपल्या मानसिकतेसाठी प्रचंड घातकसुद्धा ठरत आहे. सोशल मीडियामुळे आपण इतरांचं अनुकरण करण्याकडे जास्त भर देऊ लागलो आहोत. सध्या आपण सोशल मीडियासाठी जगताना दिसतो आहोत. याच माध्यमातून निर्माण होणाऱ्या गैरसमजांचं देखील प्रमाण जास्त आहे. सोशल मीडियावर आपण कशारीतीने अवलंबून आहोत, याचं उत्तम उदाहरण सोशल डायलीमा या डॉक्युमेंट्रीमध्ये दिसेल.
जेफ ओरलोस्की यांनी सोशल मीडिया आपल्यावर कसा प्रभाव पाडतो यावर आधारित एक “सोशल डायलीमा’ ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केली. या माहितीपटाच्या आधारे “आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या माध्यमातून आपण फेसबुक असेल, इन्स्टाग्राम असेल, गुगल असेल किंवा जी समाजमाध्यमं आपण वापरतो ती समाजमाध्यमं आपल्याला कशी स्वतःच्या विळख्यात अडकवतात, याची माहिती यात दिलेली आहे.
“आपल्याला सोशल मीडियाचं व्यसन लागलं आहे का?’, हा प्रश्न तुम्ही स्वत:ला विचारून पाहा. तुम्ही आपसुकच “नाही’ म्हणाल, मात्र जर खालील काही प्रश्न तुम्ही स्वत:ला विचारले, तर कदाचित तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर कळेल.
– तुम्ही सतत सोशल मीडिया उघडून बघता का?
– कोणती व्यक्ती नक्की काय पोस्ट करते याकडे तुम्ही आवर्जून लक्ष देता का?
– एखाद्या व्यक्तीने पोस्ट केलेले फोटो, व्हिडियो यावर तुम्ही विचार करता का?
– सतत फोन चेक करता का?
हे सगळं जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला नक्कीच थोड्या प्रमाणात सोशल मीडियाचं व्यसन लागलं आहे. ही साधी टेस्ट केल्यावर तुम्हाला तुमचं उत्तर नक्की मिळेल.
प्रान्सेस होजन या फेसबुक कंपनीत काम करत होत्या. मात्र त्यांच्यासमोर काही धक्कादायक खुलासे आले. त्यांनी त्यासंबंधित काही शेकडो कागदपत्रं जमा केले आणि त्याच्या आधारावर अमेरिकेतील तपास यंत्रणांकडे अनेक तक्रारीसुद्धा दाखल केल्या. त्या आधी त्यांनी फेसबुक कंपनीचा राजीनामा दिला होता. आपण फेसबुकच्या कंपनीचं बिंग फोडत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
स्वत:चा फायदा आणि लोकांची सुरक्षा यात वारंवार संघर्ष होत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. फेसबुक नेहमीच स्वत:च्या फायद्याचा विचार करत आहे. याचा परिणाम म्हणजे लोकांमध्ये दरी वाढवणं, द्वेष निर्माण करणे, अफवा पसरवणे, धोके आणि संघर्ष वाढवणं. या आधारावर फेसबुक स्वत:ला मोठं करून घेत आहे. आपल्या सुरक्षेची किंमत मोजून ते जवळपास ट्रिलियन डॉलर्सची कंपनी बनली आहे. फेसबुकमध्ये काम करताना मला या हादरवून सोडणाऱ्या सत्याची जाणीव झाली. या फेसबुकमध्ये नेमकं काय घडतंय हे कोणालाच माहीत नाही किंवा कळत नाही, असे होजन यांचं मत आहे. इन्स्टाग्राममुळे महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यांना त्यांच्या दिसण्याबाबत किंवा शरीराबाबत नकारात्मक वाटू लागतं, असं कंपनीने स्वत:चं केलेल्या संशोधानातून समोर आलं होतं.
सोशल मीडिया अभ्यासक योगेश बोराटे सांगतात, सोशल मीडियाचा वापर आपण केव्हा, कधी, कसा आणि कितीवेळ करत आहोत यावर सगळं अवलंबून आहे. तुम्ही जर त्याच्यावर अवलंबून राहाल तर त्याचं व्यसन फार वाईट आहे. सोशल मीडिया तुमच्यावर सतत नजर ठेवून असतो. तुम्ही काय बघता, काय सर्च करता, यावर त्यांचं लक्ष असतं. तुम्ही गुंतून राहावं म्हणून तुम्हाला त्याच त्याच पोस्ट दाखवत राहतात. त्यामुळे आपला मौल्यवान वेळ वाया जाऊ शकतो. मी सोशल मीडियाचा बारीक अभ्यास करतो. मला जेव्हा वाटलं की, आपल्याला याची सवय लागली आहे. त्यावेळी मी माझ्या फोनमधल्या सगळ्या ऍप्सच्या नोटिफिकेशन बंद केल्या. त्यामुळे आता मला सोशल मीडिया जेव्हा बघायचा असतो तेव्हाच मी बघतो आणि नोटिफिकेशन बंद केल्यामुळे सतत माझं मोबाइलकडे लक्ष जात नाही.
माईंड कोच असलेल्या तेजस्विनी कुलकर्णी सांगतात, सोशल मीडियाचा मानसिकतेवर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होतात. मात्र त्यात नकारात्मक परिणाम होण्याचे प्रमाण जास्त आहे. नकारात्मक परिणामाचे खूप प्राथमिक कारणं आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. लोकांच्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या घडामोडीच लोक सोशल मीडियावर पोस्ट करत असतात आणि आपण त्या घडामोडींची तुलना आपल्या दैनंदिन आयुष्याशी करत असतो. ही तुलना केल्याने त्याचा मानसिकतेवर प्रचंड प्रमाणात वाईट परिणाम होतो. सोशल मीडियावर अमर्याद कंटेन्ट आहे. त्यामुळे वेळ वाया जाऊ शकतो. त्याच्या अतिवापरामुळे झोपेच्या समस्या निर्माण झाल्या आहे. आपला स्क्रिन टाइम किती असायला हवा याचं देखील गणित समजून घ्यायला पाहिजे. स्क्रिन टाइम जास्त असेल तर त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे लोकांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. एकटेपणा जाणवतो. स्वप्रतिमा खराब होण्याची शक्यता असते आणि भीतीही असते. सोशल मीडियामुळे सौंदर्याचे मापदंड बदलले आहेत. स्वत:ला आहे तसं स्वीकारण्याचं प्रमाण कमी झाले आहे. याला “बॉडी शेमींग’ म्हणतात. या “बॉडी शेमींग’मुळे नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियावरचं व्हर्च्यूअल आयुष्य जगण्यापेक्षा स्वत:चं आयुष्य कसं सुंदर फुलवता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असं तेजस्विनी यांचं मत आहे.