आम्ही कधी ‘मोबिया’ हा विकार ऐकलाय? हे काय आता नवीनच? आपण ‘फोबिया’ हा तीव्र भीतीचा मनोविकार नक्कीच ऐकलेला असेल. भीती वाटणे ही फार सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु जेव्हा हीच भीती तीव्र आणि अवास्तव वाटू लागते तेव्हा मात्र ‘फोबिया’ नावाचा मानसिक विकार झाला असे म्हटले जाते. परंतु आता हे ‘मोबिया’ प्रकरण काय आहे. फोबियाचा पुढचा टप्पा तर नाही ना, अशी शंकाही आपल्या मनात निर्माण झाली असेल. परंतु अरूपगंध: ‘मोबिया’से काहीही नाही, हा विकार वैगरे काही नाही. तर मोबाइलच्या अतिवापराची मनाला लागलेली सवय, किंबहुना अतिवापराचा प्रकार, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मोबाइलमुळे आपल्याला आनंद मिळतो, असे वरवर दिसत असले तरी आपल्या शरीरात नेमके काय बदल घडतात हे समजून घेणे गरजेचे आहे.
कोणत्याही आनंदाचा, कृतीचा संबंध हा थेट आपल्या मेंदूशी जोडलेला असतो. याबाबत अनेक मनोविकारतज्ज्ञांनी संशोधनाअंती भाष्यही केले आहे. आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचे एक रसायन असते. जेव्हा एखाद्या विशिष्ट कृतीतून उद्विपीत होऊन हे डोपामिन स्त्रवते तेव्हा तात्पुरती आनंदाची भावना निर्माण होत असते आणि यामुळेच ती कृती पुन्हा पुन्हा केली जाते. मोबाइलच्या सवयींबाबतही असंच घडतं. लोक प्रत्येक कृतीमधून मिळणारं डोपामिन घेण्याऐवजी मोबाइल किंवा व्यसनातून ते सहज लगेच मिळवण्याकडे जातात आणि त्यामुळे ते अधिकाधिक त्या चक्रात गुंतत जातात. मोबाइलच्या अती वापराने आयुष्याच्या स्वप्नांची माती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या आभासी जगात माणूस हरवल्यास प्रत्यक्ष जीवनातील त्याचे अस्तित्व तितके प्रभावी ठरणार नाही.
आज आपण आपल्या आजूबाजूला सहज नजर फिरविली तर आपल्याला असे दिसून येईल की, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण मोबाइल घेऊन बसलेले असतील. पूर्वी जपमाळ, एखादे पुस्तक आणि पाण्याचा तांब्या उशाशी ठेवून झोपले जायचे. पण हल्ली लोक रात्री झोपताना आपल्याजवळ स्मार्टफोन घेऊन झोपतात आणि सकाळी उठल्यावर झोपेतून पहिल्यांदा मोबाइल चेक करतात. जर तुम्हालासुद्धा सकाळी झोपेतून जागे झाल्यावर मोबाइल वापरण्याची सवय असेल तर ही सवय भविष्यात घातक ठरू शकते.
या सवयीमुळे तुम्हाला अनेक आजारांना सामोरे जाण्याची शक्यतासुद्धा वर्तवली गेली आहे, असे एका संशोधनात देखील सिद्ध झाले आहे. मोबाइलच्या अतिवापराने दृष्टिदोष, ताणतणाव, चिडचिडेपणा, डोकेदुखी, एकाग्रता भंग होणे, अनिद्रा, नकारात्मक दृष्टिकोन, नातेसंबंधात दुरावा, डिप्रेशन अशा एक ना अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच मोबाइलचा वापर कामापुरताच होणे गरजेचे आहे. मोबाइलच्या आहारी गेलेल्या व्यक्तींसाठी काही उपाय अवश्य नमूद करावेसे वाटतात.
मोबाइल उपवास – महिन्यातील किंवा आठवड्यातील एक दिवस आपल्याला मोबाइल उपवास म्हणून पाळायचा आहे. यात मुख्य कामे वगळता सोशल मीडिया आणि तत्सम गोष्टी पूर्णपणे बंद ठेवायच्या. यातून आपल्यामध्ये बरेच सकारात्मक बदल घडलेले दिसून येतील.
मोबाइल वेळापत्रक – ज्याप्रमाणे आपण आपल्या दैनंदिन कामांचे वेळापत्रक करून नियोजन करतो. तसेच मोबाइलच्या वापराबाबतही करायला हवे. दररोज केवळ 30 ते 45 मिनिटे एवढाच अधिकाधिक वापर असावा. यातही अनावश्यक चॅटिंग, सर्फिंगला आळा घालावा.
स्क्रीन टाइम ऍप – आपण मोबाइलचा किती वापर करतो हे समजल्यास आपल्याला हळूहळू तो कमी करता येऊ शकतो. यासाठीच याच तंत्रज्ञानातून काही ऍप्स विकसित केले गेले आहेत. यातून तुम्ही किती वेळ स्क्रीनवर असता? नेमकं कोणतं ऍप किती वेळ वापरता इथपासून सर्व बाबी नोंदविल्या जातात. यामुळे तुम्ही कोणत्या ऍपवर किती अनावश्यक वेळ वाया घालवत आहात हे ठरवता येऊ शकतं. एखाद्या ऍपचा अतिवापर होत असल्यास ठरावीक वेळेनंतर ते आपोआप बंद कसे होईल यासारखे फायदेही यात आहेत.
छंद देतील आनंद – मोबाइल वापराऐवजी आपल्याला भावणाऱ्या गोष्टी, खेळ, वाचन किंबहुना छंद जोपासता आले पाहिजेत. या छंदांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला आनंद मिळणार असून कल्पनाशक्तीला देखील चालना मिळणार आहे.
मेडिटेशन – मेडिटेशनच्या माध्यमातून स्वतःला स्वयंसूचना देऊनही आपण मोबाइलचा वापर कमी करू शकतो. मात्र स्वयंसूचनांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे.
जागाबदल – अनेकदा खिशात हात गेला की, आपण मोबाइल हातात घेऊन पाहत बसतो. अशा वेळी आपण मोबाइलची जागा सातत्याने बदलायला हवी. मग ती खिशात, गाडीत किंवा आपल्या आजूबाजूची नेहमीची असो.
नोटिफिकेशन्स बंद – मोबाइलच्या स्क्रीनवर दिसणारे नोटिफिकेशन्स आपले मन विचलित करतात. परिणामी आपण हातचे काम सोडून अनावश्यक गोष्टी पाहत बसतो. यासाठी मोबाइलच्या सेटिंगमध्ये जाऊन नोटिफिकेशन्स बंद करून टाकाव्यात. जेणेकरून आपल्याला अनावश्यक मोबाइलचा वापर कमी करता येईल.
इंटरनेट बंद – मोबाइलच्या इंटरनेटचा वापर फक्त कामापुरताच करा. जेणेकरून इंटरनेट बंद असल्याने त्यावेळी मोबाइलकडे जास्त लक्ष जाणार नाही.
कुटुंबाला वेळ द्या – सतत मोबाइलवर राहण्यापेक्षा आपल्या कुटुंबाला, मित्रपरिवाराला, आप्तेष्टांना वेळ द्या. त्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन सुसंवाद वाढवा. याने आपोआपच आपले मोबाइलकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होईल.
– सागर ननावरे