नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. 4) त्यांच्या मोदी आडनावाच्या टिप्पणीबद्दल 2019 च्या मानहानीच्या खटल्यात त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. हा निर्णय राहुल गांधी आणि काँग्रेसच्या राजकीय आयुष्यासाठी फारच महत्वाचा ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी न्यायालयाच्या या निर्णयानंतर सूचक ट्विट केले आहे.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता राहुल गांधींची खासदारकी पुन्हा बहाल होऊ शकते आणि त्यांना पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याचाही मार्ग मोकळा होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी आणि कॉंग्रेस पक्षासाठीहीं हा एक उत्साहवर्धक निर्णय मानला जात आहे. अश्यातच प्रियांका गांधी यांनी गौतम बुद्धांचा एक विचार ट्विट केला आहे.
प्रियांका गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,”तीन गोष्टी कधीच लपत नसतात. सूर्य, चंद्र आणि सत्य – गौतम बुद्ध” हा विचार ट्विट करत प्रियांका गांधी यांनी न्यायालयाचे आभार मानत सत्यमेव जयते.!” असं ट्विट केलं आहे.
“Three things cannot be long hidden: the sun, the moon, and the truth”
~Gautama Buddha
माननीय उच्चतम न्यायालय को न्यायपूर्ण फैसला देने के लिए धन्यवाद।
सत्यमेव जयते।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 4, 2023
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. आर. गवई, पी एस नरसिम्हा आणि संजय कुमार यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटले आहे, की राहुल गांधींना दोषी ठरवताना ट्रायल कोर्टाच्या न्यायमूर्तींनी त्याचे नेमके कोणतेही कारण दिले नाही. एका खटल्यात सुप्रिम कोर्टाने राहुल गांधी यांना समज दिली होती. त्याचा दाखला देण्याखेरीज ट्रायल कोर्टाने राहुल गांधी यांना नेमका का दोषी ठरवले जात आहे याची कारणमिमांसा दिलेली नाही असे निरीक्षणही सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे.
आज सुनावणीला सुरुवात होताच, राहुल गांधी यांच्यावतीने बाजू मांडताना ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी म्हणाले की आपला अशिल कठोर गुन्हेगार नाही आणि भाजप कार्यकर्त्यांनी त्याच्यावर अनेक खटले दाखल केले असूनही त्यांना यापुर्वी कोणत्याही खटल्यात कधीही दोषी ठरविण्यात आलेले नाही.