नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. 4) त्यांच्या मोदी आडनावाच्या टिप्पणीबद्दल 2019 च्या मानहानीच्या खटल्यात त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. हा निर्णय राहुल गांधी आणि काँग्रेसच्या राजकीय आयुष्यासाठी फारच महत्वाचा ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की…, “राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा दिली कारण लोकसभेत त्यांचं सदस्यत्व रद्द करायचं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना न्याय दिला आहे. ते संसदेच्या बाहेर आणि आतमध्ये जनतेचा आवाज बुलंद करतील.
नरेंद्र मोदी राहुल गांधी यांना घाबरले आहेत हे यातून दिसलं आहे. राहुल गांधी लवकरच पूर्व-पश्चिम भारत जोडो यात्रा काढतील. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा नक्की विजय होईल. आणि ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या पराभवाची नांदी आहे.’ असं ते यावेळी बोलताना म्हणाले.
मानहानी खटल्याचा घटनाक्रम !
– 13 एप्रिल 2019 – लोकसभेच्या प्रचारादरम्यान कर्नाटकात राहुल गांधी यांचे “सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का आहे?’ असे भाष्य.
– 16 एप्रिल 2019 – राहुल यांच्या वक्तव्यावरून गुजरात भाजपचे आमदार पुर्नेश मोदी यांचा सूरत सत्र न्यायालयात मानहानीचा दावा.
– 2 मे 2019 – सूरत न्यायालयाचे याचिका दाखल करून घेत राहुल गांधींना समन्स.
– 10 ऑक्टोबर 2019 – राहुल गांधींनी न्यायालयात हजर होत आपली बाजू मांडली.
– 23 मार्च 2023 – सुरत कोर्टाने राहुल दोषी ठरवत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावताना जामीनही दिला.
– 24 मार्च 2023- लोकप्रतिनिधी कायद्यानुसार अवघ्या चोवीस तासांच्या आत लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी निलंबित केली.
– 20 एप्रिल 2023 – सूरत जिल्हा न्यायालयाने राहुल गांधींची शिक्षा कायम ठेवली.
– 7 जुलै 2023 – अहमदाबाद हायकोर्टानेही 66 दिवस निकाल राखून ठेवत राहुल गांधींची शिक्षा कायम ठेवली.
– 4 ऑगस्ट 2023 – अखेर शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने दिलासा देत राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली.