कर्जत – तालुक्यातील रस्त्यांवर वाढलेल्या ऊस वाहतुकीने रस्ते खचले आहेत. खोलवर पडलेले खड्डे, कडा तुटलेल्या साइडपट्ट्या, दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे यामुळे प्रवाशांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
बारडगाव सुद्रिक येथील अंबालिका साखर कारखान्याला जोडणाऱ्या रस्त्यांची सध्या बिकट अवस्था झाली आहे. ट्रॅक्टर, ट्रकने प्रमाणापेक्षा जास्त उसाची भरती करुन वाहतूक केली जात आहे. खेड- करमनवाडी-अंबिकानगर तसेच भांबोरा-राशीन वरुन अंबिकानगरकडे येणाऱ्या रस्त्याला अवकळा आली आहे.
खेड, औटेवाडी,राजेगाव तसेच पुणे जिल्ह्यातील उसाची वाहतूक याच मार्गावरून होते. जड वाहतुकीमुळे मुख्य रस्ते खचून त्यावर मोठे खड्डे पडले आहेत.एक-दीड फूट खोल पडलेल्या खड्ड्यातून वाहनेच बाहेर निघत नसल्याने डांबरीकरण रस्त्यावर मुरुम टाकून खड्डे बुजविण्यात आले. मात्र रस्त्यावर टाकलेल्या मुरमाच्या ढिगावरुन वाहने गेल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले दिसते.
खेड- करमनवाडी रस्त्याच्या साइडपट्ट्या तसेच रस्ताही जागोजागी खचल्याने उसाचे ट्रेलर पलटी होण्याचे प्रमाण वाढले आहे.रस्त्यावर पडलेल्या उसाच्या ढिगामुळे वाहतुकीला अडथळे येतात. या भागातून खेड, भिगवण, बारामतीला प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही जीवघेणी कसरत करावी लागत आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉली पलटी होण्याचे प्रमाणही या भागात वाढले आहे.