भोर (प्रतिनिधी) – भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण जलाशयात केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक असून, मागील वर्षी १८ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत धरणात ८ टक्के पाणी साठा कमी असल्याने धरण प्रशासनाने धरणातील पाण्याचा विसर्ग बंद केला आहे. मागील वर्षी,तालुक्यातील नीरा देवघर व भाटघर ही दोनही धरणे १०० टक्के भरली होती. नीरा देवघर धरणात १२ टीएमसी, तर भाटघर धरणात २४ टीएमसी पाणी साठा होता. सध्या भाटघर धरणात १० टक्के पाणीसाठा राहिल्याने पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.
मागील वर्षी धरणात १८ टक्के पाणीसाठा होता. तर नीरादेवघर धरणात १९ टक्के पाणीसाठा असून, धरणातून २३०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागील वर्षी धरणात ४५ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत २१ टक्के पाणीसाठा कमी आहे. गुंजवणी धरणात २५ टक्के पाणीसाठा असून धरणातून ३०० क्युसेकने पाणी सोडले आहे. तर मागील, वर्षी धरणात ४० टक्के पाणीसाठा होता . म्हणजे धरणात १२ टक्के साठा कमी आहे, तर वीर धरणात सध्या ३४ टक्के साठा असून मागील वर्षी ४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.
भाटघर, नीरा देवघर, वीर, गुजंवणी या चार ही धरणात १६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून ८ टीएमसी पाणी क्षमता उपलब्ध आहे. गतवर्षाच्या तुलनेने ३२ टक्के पाणीसाठा असून १५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.
मागच्या तुलनेत नऊ टक्के पाणीसाठा कमी आहे. तीनही धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पाणीसाठा कमी राहिला आहे. भोर वेल्हे बरोबरच पूर्व भागातील गावातही मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे धरणातून पाणी सोडल्याने पाणीसाठा अत्यंत कमी झाला असून अशीच परिस्थिती राहिल्यास पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.
धरण ऊशाला आणि कोरड घशाला
भोर तालुक्यात दोनदोन धरणे असताना ऐन ऊन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तसेच, नळपाणी योजनाही बंद पडत असून धरण ऊशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था होत असून ऊन्हाचा पारा वाढत असल्याने पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. सात गावांना टँकरणे पाणी पुरवठा करावा लागणे टँकरमुक्तीची घोषणा कागदावरच राहत आहे.