भुईंज -किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याकडे गतवर्षी गाळप हंगामासाठी आलेल्या चार लाख 60 हजार 546 मेट्रिक टनाचे ऊसाचे बील 119 कोटी 74 लाख 20 हजार 614 रूपये यापुर्वीच प्रतिटन 2 हजार 600 रूपयांप्रमाणे जमा केलेले होते. तर एफआरपीप्रमाणे उर्वरित 50 रूपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे होणारी रक्कम दोन कोटी 30 लाख 27 हजार 667 रूपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या खात्यामध्ये वर्ग केल्याची माहिती, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली आहे.
याबाबतच्या पत्रकात पुढे म्हटले आहे, की किसन वीर कारखान्याची रिकव्हरी (ऊस उतारा) 11.70% आहे. एफआरपीप्रमाणे 2650 रूपये प्रति मेट्रिक टन इतका दर निघत असून त्यानुसार ऊस बीलाची संपुर्ण रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.
आ.मकरंद पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे एफआरपीप्रमाणे जो दर निघेल तो दिला जाईल, हा सभासदांना दिलेला शब्द आज खऱ्या अर्थाने पुर्ण झाल्याचा आनंद आमच्या व्यवस्थापनास आहे. कारखान्याचे ऊसाचे बील एफआरपीप्रमाणे जमा झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. किसन वीर व खंडाळा कारखान्यातील येणाऱ्या गळीत हंगाम सन 2023 – 24 दृष्टीने सर्व अंतर्गत कामे पुर्णत्वास आली असून यावर्षीचा गळीत हंगाम पुर्ण क्षमतेने चालविण्यासाठी ऊस तोडणी यंत्रणेचे आवश्यक करार झाले आहेत. तसेच तोडणी यंत्रणेस पहिला हप्ता दिलेला असून, दुसरा हप्ताही लवकरच देण्यात येणार आहे. किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या सभासद व बिगर सभासदांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपला संपुर्ण ऊस दोन्ही कारखान्यास द्यावा.
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार
किसन वीर कारखान्याकडे गळितास आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन 50 रूपयांप्रमाणे रक्कम वर्ग केली असून यातून ते शेतीच्या मशागतीची कामेही करू शकतात. तसेच आमदार मकरंद पाटील व त्यांचे व्यवस्थापन शेतकऱ्यांची दिवाळीही निश्चितपणे गोड करणार असल्याची माहिती प्रमोद शिंदे यांनी यावेळी दिलेली आहे.