वाई – किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने 15 ऑक्टोंबरला सुरू करणार असून किसन वीरच्या सभासद शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पैसे देणार, कामगारांचे पगार वेळेवर करणार, तुमच्या पै ना पै चा हिशोब देणार आणि ज्यांनी तुमच्या घामाचा पैसा बुडविला त्यांच्याकडून वसूल केल्याशिवाय गप्प बसणार नाही.
खंडाळा कारखान्यामध्ये सत्तांतर झाल्यावर “किसन वीर’च्या निवडणुकीतही शेतकरी सभासदांनी हुकुमशाहीला बाहेर काढून लोकशाही पुर्नप्रस्थापित केली, असे किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले. किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने 15 ऑक्टोंबरला सुरू करणार आहे, असे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी सांगितले.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची 51 वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी आमदार मकरंदआबा पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष व कारखान्याचे संचालक नितीन पाटील, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, “किसन वीर’चे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे उपाध्यक्ष अनंत तांबे, बावधन सूतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार पाटील म्हणाले, “”आजची सभा निर्भिडपणे व आनंददायी मोकळ्या वातावरणात पार पडीत असल्याचा आनंद असून आज बऱ्याच वर्षांनंतर लोकशाही दिसत आहे. लोकशाहीमध्ये जय- पराजय होत असतो.
सभासदांनी 19 वर्षापूर्वी सत्तातर करीत सुत्रे विरोधकांच्या हाती दिली. मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्यामध्ये काहीतरी सुधारणा होईल या उद्दात्त हेतुन आम्ही बाय दिला. परंतु, यांच्यामध्ये काहीही सुधारणा न होता त्यांनी कारखान्यावरील कर्जाचा बोजा एवढा वाढवला की ऊस असतानादेखील कारखाना बंद ठेवला. आणि गाळप सुरू केले 28 दिवस. त्यातील 14 दिवस गाळप केले ते देखील मागील वर्षांचे शेतकऱ्यांचे पैसे न देता. त्यामुळे कारखान्याचा 18 कोटीचा तोटा वाढला. कारखान्यावरील कर्जाच्या बोजामध्ये वाढ झाली.”
शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान, मनस्ताप विचारात घेता तीन टर्म आमदार केले त्या लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी पळ न काढता कारखान्याची निवडणुक लढविली व जिंकलीही. परंतु, त्यानंतर आमच्यासमोर आली ती कारखान्याची भयानक अवस्था. कोणतीही बॅंक पैसे देत नसल्यामुळे यावर भाग भांडवल वाढविण्याचा एकच मार्ग दिसला. याबाबत केलेल्या आवाहनाला आपणाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
त्यामुळे आपण कारखाना सुरू करण्याच्या मार्गावर आहोत. नोंद केलेला पूर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यास गळितासाठी द्यावा, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले. नितीन पाटील म्हणाले, “भाग भांडवल वाढविण्याच्या आवाहनाला मिळालेला प्रतिसादामुळेच ऊस तोड वाहन मालकांना पहिला हप्त्याचे वाटप करू शकलो. दुसरा हप्ताही दोन दिवसांत देणार आहोत. दोन्ही कारखान्यांतील अंतर्गत कामेही अंतिम टप्प्यात आहेत. दोन्ही कारखान्याचे मिळून 12 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ असून त्याप्रमाणात यंत्रणाही भरण्यात आली आहे.” नोटीस वाचन प्रमोद शिंदे यांनी केले. सर्व विषय एकमताने मंजूर झाले.
शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक
“किसन वीर’च्या सभासदांच्या ठेवीची मुदत वाढविण्याबाबत विषय येताच शेतकऱ्यांनी याप्रश्नी मागील व्यवस्थापनावर ताशेरे ओढीत आमदार मकरंद पाटील यांच्या व्यवस्थापनावर विश्वास ठेवत आपण बंद पडलेल्या कारखान्यास उर्जितावस्थेत आणत आहात तर आम्हीही आमच्या ठेवींची मुदत 7 वर्षे ऐवजी 10 वर्षांपर्यंत वाढविण्यात याव्यात असेही सांगण्यात आले. यावेळी बाबासाहेब कदम, राजेंद्र शेलार, बाबुराव शिंदे यांनी ठेवीबद्दल दिलेला लढा यशस्वी झाला. त्यामुळेच या ठेवी जिवंत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करा असे सांगितले.