हर्षद कटारिया
सहकारनगर – तळजाई टेकडीवर नैसर्गिक जैवविविधता टिकावी या हेतूने वनविभागातर्फे वृक्षरोपणावर कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात येत आहे. परंतु, स्वदेशीच्या नावाखाली परदेशी वृक्षांचे रोपण करण्यात आल्याने यातील मुख्य हेतुकडेच वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. पर्यावरण अभ्यासकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
तळजाई टेकडीवरील ग्लिरिसिडिया म्हणजेच रानमारी या सारखी उपयोगी झाडांना मारक ठरणारे झाडे काढून त्याजागी स्वदेशी उपयोगी ठरणारे झाडे लावण्याचे काम वनविभागाकडून सुरू आहे. परंतु, वाघजाई पट्ट्यात लावण्यात आलेली 70 टक्के झाडे ही चुकीची तसेच पदरेशी असल्याचे तसेच या झाडांचा काहीही उपयोग नसल्याचे, निसर्गातील कुठल्याच घटकास त्यांचा उपयोग होत नसल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे. टेकवडीवर वृक्षारोपण करताना स्वदेशी रोपे आणण्याची काळजी घेतली गेली नसल्याचे वनविभगाकडून करण्यात आलेल्या कामातून उघड होत आहे.
पुण्यातील अनेक टेकड्यांवर वृक्षारोपण होत असून बहुतांशी ठिकाणी निरूपयोगी परदेशी झाडे लावल्यामुळे जैवविविधतेला फायदा होण्याऐवजी अशा झांडांचा धोकाच अधिक आहे. काही परदेशी झाडे केवळ वेगाने वाढत असली तरी त्याचा काहीही उपयोग निसर्गाला होत नसल्याने पेरू, रामफळ, नारळ अशी झाडे लावण्याचे धोरण आहे. परंतु, अशा उपयोगी झाडांच्या रोपणाकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असून याबाबत अभ्यासकांसह नागरिकांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.
“तळजाई टेकडीवर 15 हेक्टर क्षेत्रात ग्लिरिसिडियाची झाडे काढून तेथे स्वदेशी झाडे लावण्यात येत आहेत. यासाठी 1 कोटी 34 लाख रुपये खर्च करण्यात येत असून चेरी सारखी फळांची झाडे लावल्यामुळे पक्षी येण्याचे प्रमाण वाढले आहे. येथे सर्व झाडे स्वदेशीच लावलेली असून काही विदेशी झाडे लावली गेली असल्यास काढण्यात येतील.” – प्रदीप शंकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी
“तळजाई टेकडीवर वृक्षारोपण करताना अनेक विभागाकडून आलेली झाडे ओळखण्यासाठी वनविभागाकडे यंत्रणाच नाही. वाघजाई पट्ट्यात 70 सत्तर टक्के झाडे चुकीची लावलेली आहेत. या शिवाय वाघजाई परिसरात जाकरांडा, तारू, टैबेबुया, सैना अशी अनेक परदशी झाडे लावली आहेत. वनविभागाचे योग्य व्यवस्थापन नसल्याने यावरील निधी वाया जाणार आहे.”- केतकी साठे, पर्यावरण शास्त्रज्ञ