पुणे -करोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि काही दिवसातच पुणे शहरासह जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला.
मार्च आणि एप्रिलमधील या भयाण स्थितीचा अनुभव घेता यापुढे करोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी राज्यातील 25 साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीची तयारी दर्शवली आहे.
त्यामध्ये 19 साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी तैवान येथून यंत्रसामग्री मागविली आहे. लवकरच या कारखान्यांमधून ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे आवाहन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले होते.
त्यानुसार राज्यातील 25 कारखान्यांनी तयारी दर्शविली असून धाराशिव साखर कारखान्यांने प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मिती सुरू केली आहे. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची महिती दिली.
ऑक्सिजन निर्मितीबरोबर यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर दिला आहे. केंद्र सरकारने 108 कोटी लिटरचे उद्दिष्ट दिले होते. ते उद्दिष्ट कारखान्यांनी पूर्ण केले आहे. साखर कारखान्यांनी यावर्षी इथेनॉल निर्मितीकडे लक्ष केंद्रीत केल्यामुळे साखरेचा गाळप उतारा 10.50 टक्के झाला आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.