अस्वच्छतेच्या कारणावरून आरोग्य सभापती राजीनामा देण्याच्या तयारीत
कराड – स्वच्छ सर्व्हेक्षणात देशात पहिला क्रमांक मिळालेल्या कराड पालिकेचे आरोग्य सभापती महेश कांबळे यांच्या वॉर्डमध्ये बारा डबरी परिसरात पालिका स्वच्छता करत नसल्याने ते राजिनामा देण्याच्या तयारीत आहेत. तसेच त्या भागातील नागरिकही अस्वच्छतेबाबत संतप्त आहेत. दरम्यान, आरोग्य सभापती कांबळे यांच्या प्रभाग क्रमांक 14 मधील अस्वच्छ असलेल्या भागाची उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आज पहाणी केली. त्यावेळी त्यांनी मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभारावर टीकेची झोड उडवली. तसेच त्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही सांगितले.
येथील बाराडबरी परिसरात कराड पालिकेने घरकुले बांधली आहेत. तेथे घरकुल परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्या परिसरातील ड्रेनेजचा प्रश्न कायम आहे. तो न सुटल्याने त्या परिसरात अस्वच्छता पसरली आहे. दुर्गंधी वाढली आहे. सहा महिन्यापासून त्या परिसरात साचलेले सांडपाणी, ड्रेनेजचे पाणी साचून राहिले असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याची स्वच्छता करून घ्यावी, अशी मागणी तीन महिन्यापासून आरोग्य सभापती काबंळे करत आहेत.
मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. स्वच्छताच होत नसल्याने थेट राजिनामा देण्याचा पवित्रा सभापती कांबळे यांनी घडला आहे. दरम्यान, उपाध्यक्ष जयवंत पाटील यांनी बाराडबरी परिसरातील भागाची पहाणी केली. या परिसराची स्वच्छता झाली पाहिजे, अशी मागणी पालिकेस केली आहे. यावेळी स्वच्छता होत नसल्याबाबत आरोग्य सभापती कांबळे यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, शहरात एकीकडे स्वच्छता केल्याचे दाखवले जात आहे. मात्र, मी ज्या भागात राहतो. ज्या भागाचे प्रतिनिधीत्व करतो. त्याच भागात ड्रेनेजचा प्रश्न कायम आहे.
सहा महिन्यांपासून त्याची स्वच्छता करून घ्यावी, अशी आम्ही मागणी करत आहोत. मात्र, त्यात टाळाटाळ होत आहे. त्यामुळे त्या सगळ्याला कंटाळून नाकर्ता आरोग्य सभापती म्हणून काम करण्यापेक्षा राजिनामा दिलेलाच बरा, तो राजिनामा मी लवकरच देत आहे. उपाध्यक्ष जयवंत पाटील म्हणाले, शहरात स्वच्छतेचे काम केल्याचे दाखवले जात आहे. मात्र, बारा डबरी परिसरातील लोक अत्यंत वाईट जिणे जगत आहेत. हा वॉर्ड मागासवर्गीय आहे. त्यामुळे तेथे सुविधा पुरवल्या जात नाही, हे योग्य नाही. मुख्याधिकारी डांगे मनमानी कारभार करत आहेत. त्या विरोधात आम्ही आंदोलन छेडू. त्यापूर्वी त्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहे. मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करायला जिल्हाधिकारी यांना भाग पाडू. आणि या भागातील स्वच्छता करायला भाग पाडू असे ते म्हणाले.