नवी दिल्ली : भारताचा शेजारी असणारा श्रीलंका हा सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे तिथे सत्ताधाऱ्यांविरोधात आगडोंब उठला आहे. याचाच हंडर घेत भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी देशातील मोदी सरकारला इशारा दिला आहे. श्रीलंकेतील परिस्थिती बघता येथील नागरीक भारतात निर्वासित होण्याची शक्यता आहे त्यामुळे भारताला काळजी घ्यावी लागेल, असे स्वामी यांनी म्हटले आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करत श्रीलंकेतील आंदोलकांवर टीका केली आहे. ”श्रीलंकेतील नेत्यांच्या घरावर होणारे आक्रमण आणि येथील नागरिकांकडून ट्वीटरवरील द्वेषपूर्ण भाषण बघता, श्रीलंकेतील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. ट्विटरवर श्रीलंकेतील आक्रमक जमाव अश्लील आणि असभ्य भाषा वापरत आहे. सुसंस्कृत श्रीलंकेने या झुंडशाहीला विरोध करून त्यांना त्यांची जागा दाखवावी”, असे ट्वीट स्वामी यांनी केले आहे.
तसेच पुढे बोलताना स्वामी यांनी, “श्रीलंकेला सैन्य मदत देण्याचे समर्थन केले आहे. ”गोटाबाया आणि महिंदा राजपक्षे हे दोघेही निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत. जर राजपक्षे यांना भारताची सैन्या मदत हवी असेल, तर ती भारताने द्यायला हवी”, असेही त्यांनी म्हटले आहे.
श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या राजकीय आणि आर्थिक संकटामुळे तिथून अवैध स्थलांतर रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दल श्रीलंकेच्या सागरी सीमेवर हाय अलर्टवर आहे. तेथे सध्या सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे बेकायदा स्थलांतर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय तटरक्षक दलाने रामेश्वरमजवळील मंडपम तळावर हॉवरक्राफ्ट तैनात केले आहे.